चिंदर येथील गुरांना झालेला आजार प्रथमदर्शनी वनस्पती जन्य विषबाधा

आचरा (प्रतिनिधी): चिंदर गावात आलेल्या साथसदृश्य आजाराने 97बाधित तर45मरण पावली आहेत. शवविच्छेदन अहवालानुसार चार्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अहवाल असून त्यावर खात्री करण्यासाठी पुणे प्रयोगशाळेचे पथक येवून आवश्यक रक्त नमुने,चारा नमुने घेऊन तपासणी नंतरच रोगाचे निश्चित कारण समजेल असे कोकण विभाग पशुसंवर्धन प्रादेशिक सह आयुक्त डॉ प्रशांत कांबळे यांनी चिंदर येथे सांगितले. बुधवारी दुपारी चिंदर येथे दाखल झालेल्या डॉ कांबळे यांनी चिंदर भटवाडी, गावठणवाडी भागातील बाधित जनावरांची पहाणी केली. यावेळी त्यांच्या सोबत सिंधुदुर्ग जि. प. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अतुल डांगोरे, जि. प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, मालवण तहसिलदार श्रीमती वर्षा झालटे, ,भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर,प्रभारी सरपंच दिपक सुर्वे,मंडल अधिकारी अजय परब, डॉ रविंद्र दळवी, डॉ तुषार वेर्लेकर, डॉ शिवाजी लोखंडे, डॉ विवेक ढेकणे,ग्रामविकास अधिकारी मंगेशसाळसकर आदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना डॉ कांबळे यांनी हा रोग समु नष्ट करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी मालवण,कणकवली, देवगड,येथील पशुवैद्यकीय पथके याभागात कार्यरत असून शेतकऱ्यांनी जनावरे मलूल ,आजारी दिसल्यास तातडीने पशुवैद्यकीय विभागाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी या भागाची प्रादेशिकता लक्षात घेवून पशुवैद्यकीय दवाखाने वाढविण्याची डॉ कांबळे यांच्या कडे मागणी केली.

error: Content is protected !!