रानभाजी पाककृती स्पर्धेत शेकडोंचा सहभाग
कणकवली (आनंद तांबे) : काळात तरुण पिढी फास्ट फूड व जंक फूडच्या विळख्यात अडकत आहे. त्यांना त्यांना या विळख्यातुन बाहेर काढण्यासाठी निसर्गात उपलब्ध असलेल्या रानभाज्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.यासाठी रानभाज्यांचे सर्वत्र जनजागृती केली पाहिजे, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी विशाल खत्री यांनी केले.
कणकवली कॉलेज, कणकवलीचे आयक्यूएसी व सायन्स असोसिएशन आणि स्नेह सिंधु कृषि पदवीधर संघ, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, आत्मा कृषि विभाग सिंधुदुर्ग व उमेद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने “रानभाज्या महोत्सव २०२३ अंतर्गत “जिल्हास्तरीय रानभाज्या पाककृती स्पर्धा व रानभाज्या प्रदर्शनाचे” आयोजन कणकवली कॉलेज, कणकवली येथे केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या अध्यक्ष डॉ. राजश्री साळुंखे तालुका कृषी अधिकारी वृषाली मुळये, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत, पंकज दळी, कृषी विभाग आत्मा सिंधुदुर्गच्या भाग्यश्री नाईकनवरे, उमेद अभियान च्या अमृता चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे अध्यक्ष रवी परब, रोटेरियन विद्याधर तायशेट्ये, दादा कुडतरकर, मेघा गांगण, कणकवली कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. निलेश कोदे यांच्यासह कणकवली कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व जिल्हाभरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या, निसर्गाने नटलेल्या कोकण भूमीत रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याचा सर्वांनी वापर करून आपल्या आहारात त्याचा उपयोग केला पाहिजे. यातून विविध आजारांवर लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढते. असे त्यांनी सांगितले. यावेळी रवी परब, भाग्यश्री नाईकनवरे, प्राचार्य युवराज महालिंगे, मंगलताई परुळेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धेतील स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
रानभाज्या पाककृती स्पर्धा व रानभाज्या प्रदर्शन याची सुरुवात दिप प्रज्वलन करून तसेच फीत कापून करण्यात आली. रानभाज्या पाककृती स्पर्धेसाठी जिल्हाभरातील विविध भागामधील १३९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी विविध रानभाज्यापासून उत्कृष्ट पाककृती तयार केली होती. रानभाज्या प्रदर्शनासाठी केळफुल, गुळवेल, भुई आवळा, एक पानी, लाजाळू, तेरंज, अळूची पाने, भोपळा पान, मुगणी, मोठा दिंडा, कपाळ फोडी, सोनारी वेलीची पाने, गारंबी, आघाडा, करडू, शेवगा, नीव, सुरणाची पाने इत्यादी रानभाज्यांचा समावेश होता.
जिल्हास्तरीय रानभाजी पाककृती कलेत एकूण 140 महिलांनी भाग घेतला यात विजेता स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली प्रथम क्रमांक सौ स्नेहलता सुनील सावंत गाव वरवडे, द्वितीय क्रमांक सौ दिपाली दिलीप सावंत गाव तरंदळे, तृतीय क्रमांक सौ जयश्री बाळकृष्ण फाेंडके बिडवाडी उत्तेजनार्थ पारितोषिक आर्या अनंत साटम कणकवली ,जान्हवी गजानन कारावे पिंगुळी यांच्या पाककृती ना देण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी केले.
















