शेतकऱ्यांचे सुमारे २० लाखोंचे नुकसान
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरुर तर्फ हवेली परीसरातील काजू बागायतींना गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता अचानकपणे लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर क्षेत्रामधील शेकडो काजूची झाडे होरपळून शेतकऱ्यांचे सुमारे २० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने नेरुर तर्फ हवेली येथील शेतकरी श्री दत्तात्रय परमानंद ठाकूर यांच्या मालकीची सुमारे ९ एकर क्षेत्रातील ८०० गावठी काजूची झाडे आणि ५०० काजु कलमे जळून अंदाजे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त घनश्याम दत्तात्रय देसाई , चारुदत्त रमाकांत देसाई , बाळकृष्ण श्रीराम देसाई या शेतकऱ्यांच्या मालकीची काजू झाडे जळून त्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन फळधारणा झालेली असताना आगीने हातातोंडाशी आलेला घास हिरीवून घेतल्याने शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीमुळे चिंता व्यक्त केली आहे. आणि लवकरच नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.












