६ लाख २३ हजार ४०० रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिसेकामते – गावठणवाडी येथे मंगळवारी सुनील कृष्णा गुरव यांच्या राहत्या घराला सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. घराला लागलेल्या आगीतच घरातील घरगुती वापराच्या सिलिंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका आणखी भडकला. या आगीत रोख ७० हजार रक्कम, सोन्या चांदीच्या दागिन्यांसहित, संसारोपयोगी वस्तू, जीवनावश्यक साहित्य मिळून सुमारे ६ लाख २३ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
मंगळवार १० मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. या आवाजाने परिसरात घबराट पसरली. सुनील गुरव यांच्या घरातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसताच स्थानिक ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. सिलिंडर फुटल्यामुळे आग लागली की अगोदर आग लागून उष्णतेमुळे सिलिंडरचा स्फोट झाला, याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण केले आणि घरातील साहित्याने क्षणात पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी घराचे संपूर्ण छप्पर वेढले होते.
घराच्या भिंतींनाही तडे गेले असून संपूर्ण वास्तू कमकुवत झाली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर डोक्यावरचे छप्पर हिरावले गेल्याने गुरव कुटुंब पूर्णपणे हतबल झाले आहे. महसूल प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून यात घराचे पत्रे ३०,४००, कपडे अंदाजे २०,०००, वायरींग १२,०००, लाकडी दरवाजे व खिडक्या ८ हजार, गॅस शेगडी व सिलेंडर ३५००, तीन मोबाईल २३ हजार, रोख रक्कम ७० हजार, भांडी व इतर साहित्य ५ हजार, फ्रिज १३,५००, इतर इलेक्ट्रीक बस्तू ३५००० एवढे नुकसान झाले.तसेच १ एक तोळ्याचा हार व १.५ तोळ्याचे मंगळसुत्र व तीन तोळ्यांचे मंगळसुत्र अंशतः वितळलेल्या स्थितीत मिळाले. तसेच कानातील झुमके व गळ्यातील चेन आढळली नाही. दागिन्यांची एकूण किंमत ३ लाख ६५ हजार ४०० रुपये, धान्य ४५ हजार असे मिळून एकूण ६ लाख २३ हजार ४०० रुपयांच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. सदरचा पंचनामा सरपंच प्राजक्ता मुद्राळे, पोलीस पाटील रवींद्र जाधव, माजी सरपंच सुहास राणे, तसेच ग्राम महसुल अधिकारी नयन चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी चव्हाण, संकेत राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ज्यावेळी ही भीषण आग लागली आणि काही वेळातच सिलिंडरचा स्फोट झाला, त्यावेळी सुदैवाने सुनील गुरव यांच्या घरातील कोणीही सदस्य घरात उपस्थित नव्हते. घरातील सर्व मंडळी काही कामानिमित्त बाहेर गेली होती.












