कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी प्रशालेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
रविवार २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव विद्यार्थ्यांनी घरी साजरा केला. “गुरुपौर्णिमेनिमित्त आई – वडील यांचे पाद्य पुजन ” हा उपक्रम प्रशालेमार्फत राबविण्यात आला, या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थी आणि पालक यांच्या वतीने साजरा करण्यात आला. आपल्या भारतीय आदर्श संस्कृतीचे दीर्घकालीन परिणाम रुजावेत, जन्मदात्या आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी, या उदात्त हेतूने हा आदर्शवत उपक्रम विद्यार्थ्यांनी साजरा केला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ शाळेच्या गृपवर अपलोड करूण विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमाचे आयोजन सांस्कृतिक प्रमुख आर.एन.भानुसे व प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रसाद मसुरकर यांचे विशेष मेहनत व मार्गदर्शन लाभले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक प्रशालेचे माजी विद्यार्थी व पालक वर्ग यांच्याकडून होत आहे.
सोमवार, दिनांक-२२ जुलै २०२४ रोजी प्रत्यक्ष प्रशालेत विद्यार्थ्यां मार्फत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली, हिंदू पंचांगानुसार आषाढ शुल्क पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौणिमा साजरी केली जाते. पंडित आत्माराम शास्त्री यांनी सांगितल की, धर्म ग्रंथानुसार महर्षी वेद व्यास यांचा जन्म गुरु पौर्णिमेला झाला. महर्षी वेद व्यास यांना महाभारत, पुराण आणि वेदांचे रचियते मानले जातात. त्यांनी मानवजातीला प्रथम वेदांची ओळख करून दिली, त्यामुळे त्यांना प्रथम गुरु मानले जाते. त्यांच्या जन्म दिनानिमित्त गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.त्यामुळे गुरुपौर्णिमेला “व्यास पौर्णिमा” असंही म्हणतात. गुरु पौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा आदर करणे त्यांना सन्मान देऊन कृतज्ञ व्यक्त केले जाते. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नमः” धर्मग्रंथांमध्ये गुरुंनाही देवाप्रमाणे मानलं गेलं आहे. यामुळे भारतात गुरु पूजेचे महत्व अनन्यसाधारण आहे.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील वर्ग प्रतिनिधींनी गुरुजनांचे पूजन केले व गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या, तसेच २० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या गुरू विषयी मनोगत, स्वरचित कविता व कृतज्ञता व्यक्त केली.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु.मैत्रेयी मकरंद आपटे हिने केले.











