सिंपन प्रतिष्ठान’च्या माध्यमातून विजयी भव युवा पुरस्कारासाठी आवाहन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सामाजिक, वैद्यकीय, उद्योजक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या होतकरु युवा मान्यवरांचा, सिंपन प्रतिष्ठान मुंबई, सिंधुदुर्ग संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘ विजयी भव युवा पुरस्कार ‘ देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती सिंपन प्रतिष्ठानच्या वतीने नुकतीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, विचारवंत, ज्येष्ठ समुपदेशक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक अशा विविध पैलूंनी नटलेलं सदाबहार लोकप्रिय आदर्श व्यक्तिमत्व प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मरणार्थ ‘विजयी भव युवा पुरस्काराने यथोचित असा सन्मान युवा कार्यकर्त्यांच्या केला जातो. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून त्या अनुषंगाने संस्थेच्यावतीने पुरस्कारासाठी २५ मार्च २०२५ पर्यंत आपली नावे संस्थेचे कार्यवाह बाळकृष्ण विठ्ठल जाधव,१३, कॉसमॉस (ए) को. ऑप. हौस. सोसा. शिवसृष्टी, कुर्ला (पुर्व) मुंबई २४ या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित १४/१५ मे १९३८ रोजी कणकवली येथे प्रेरणादायी कोकण पंचमहाल महार परिषद संपन्न झाली होती. त्याच संकल्पनेतून भविष्य काळाची गरज ओळखून व विधायक आणि रचनात्मक कार्य उभारण्यासाठी सकारात्मक तसेच व्यापक दृष्टीकोण ठेवून १७ मार्च २०१८ रोजी सिंपन प्रतिष्ठान मुंबई ही सेवाभावी संस्था उदयास आली. आजतागायत प्रतीवर्षी १४ मे ‘संकल्प दिनी’ कणकवली येथे नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, औषधांचे मोफत वाटप असे समाजपयोगी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तर, सन २०२३ पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना अत्यंत प्रतिष्ठेचे ‘विजय भव युवा पुरस्कार’ आणि ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येत आहेत. विजयी भव युवा पुरस्कारासाठी १८ ते ४० वयोगटातील इच्छूक प्रतिभावंत युवा मान्यवरांनी आपल्या कार्याच्या तपशीलासह अर्ज करावेत असे आवाहन सिंपन प्रतिष्ठान मुंबई, सिंधुदुर्ग’च्या विद्यमाने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!