कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असून वाहनचालकांना प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. पावशी बेलनदी पुलावर पडलेले मोठे भगदाड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, यामुळे अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या महामार्गावर दररोज हजारो वाहने धावतात. मात्र खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनावरील ताबा सुटण्याची शक्यता वाढते. यापूर्वीही महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. तरीही प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी करून जबाबदारी झटकली जाते. परिणामी वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी असून, महामार्गावरील या धोकादायक खड्ड्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.










