धुळीच्या प्रश्नावर आप चे धूळ फेक आंदोलन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरभर पडलेल्या खड्ड्यांमुळे हवेत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. नाका-तोंडात धूळ जाऊन नागरिक आजारी पडत आहेत. धुळीच्या त्रासाने वाहनचालकांना तोंडाला मास्क लावून फिरायची वेळ आली आहे. याला विरोध म्हणून रस्त्यावर पसरलेली खरमाती महापालिकेच्या दारात ओतत आप ने धुळीच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन केले.
पावसाळ्यात मुरूम टाकून केलेली तात्पुरती डागडुजी, पावसाने वाहून आलेली माती, काहीच दिवसात उखडलेले पॅचवर्क यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण वाढले आहे. केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून गेल्या दोन वर्षात अठरा कोटी रुपये खर्च झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सुद्धा शहरातील धुळीचा प्रश्न गंभीर होत आहे. चौका-चौकात लावलेले मिस्ट टॉवर बंद आहेत, हवेतील धुलिकण कमी करण्यासाठी महापालिकेने मिस्ट स्प्रेयिंग मशीन घेतले आहे, ते नेमके कुठे वापरले जाते याचे उत्तर अधिकारी देतील का असा प्रश्न आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी,उषा वडर, विजय हेगडे, संजय नलवडे, उमेश वडर, अमरसिंह दळवी, मयुर भोसले, महमदशरीफ काझी, रवींद्र राऊत, दिलीप पाटील, रमेश कोळी, लाला बिर्जे, चेतन चौगुले, शशांक लोखंडे,आदी उपस्थित होते.
















