मंत्री नितेश राणेंच्या हस्ते अष्टकृपा कंपनीच्या गुळ निर्मिती प्रकल्पाचे मोळीपूजन आणि लोगो अनावरण संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : आतापर्यंत आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करताना पाहिले होते. आज ती संधी तुम्ही आम्हाला दिली आहे. स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेला गूळ निर्मिती उद्योग हा आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. हा प्रकल्प जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देईल. त्याचबरोबर भावी पिढीला प्रोत्साहन देणारा हा उद्योग आहे. जिल्ह्यातून तरुण पिढीचे होणारे स्थलांतर थांबवायचे असेल तर अशा प्रकारचे उद्योग धंदे जिल्ह्यात निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही आत्मविश्वासाने व नियोजनबद्धपणे या प्रकल्पासाठी काम करा. तुमच्या पाठीशी मी सदैव उभा आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
नाधवडे येथील अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला स्वयंचलित गुळ निर्मिती उद्योग उभारण्यात आला आहे. या उद्योगाचे मोळी पूजन आणि लोगोचे अनावरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, बाप्पी मांजरेकर, राजेंद्र राणे, महेश संसारे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपनगराध्य प्रदीप रावराणे, सरपंच लीना पांचाळ, गुलाबराव चव्हाण, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, बंड्या मांजरेकर, महेश गोखले, उद्योजक हनुमंत नारकर, उद्योजक दिगंबर इस्वलकर, बंड्या मांजरेकर आदी उपस्थित होते.
नाम. नितेश राणे म्हणाले, हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. अशा उद्योगाना संपूर्ण सहकार्य करण्याचा सल्ला जिल्ह्याचे भाग्यविधाते, खासदार नारायण राणे यांनी आम्हाला दिले आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे या सर्वांनी जिल्ह्यात रोजगार वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले आहे. अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले, प्रकल्पामुळे उद्योजक बनण्याची भावना निर्माण होते. नोकरी देणारे हात यातून पुढे येतात. जिल्ह्यात नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजेत. उद्योगधंदे कसे येतील यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या काळात जिल्ह्यात मोठे मोठे उदयोग धंदे येणार आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे रोजगाराच्या निमित्ताने गोव्याकडे जाणाऱ्या तरुणांना पुन्हा जिल्ह्यात आणण्यासाठी मेहनत घेणार असे नितेश राणे यांनी सांगितले. जिल्ह्यात सुरु झालेले प्रकल्प हे टिकले पाहिजेत. यासाठी लागेल ती मदत मी या उद्योगाला करणार असा शब्दही नितेश राणे यांनी दिला आहे.
यावेळी महेश गोखले म्हणाले, सर्वांच्या सहकार्यातून हा उद्योग उभा राहिला आहे. दर दिवशी 80 टन ऊस गाळप क्षमता याचे आहे. दररोज नऊ टन गुळ उत्पादन होत आहे. या ठिकाणी 100 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. स्थानिक तरुणांना या प्रकल्पाचा निश्चित फायदा होईल. असे सांगितले. प्रास्ताविक संतोष प्रभाकर टक्के यांनी केले, सूत्रसंचालन व आभार संतोष श्रीधर टक्के यांनी मानले. चौकट.. नाधवडे येथील एमआयडीसी प्रकल्प सुद्धा लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन यावेळी पालकमंत्री राणे यांनी दिले…











