विकासाच्या उंबरठ्यावरील किर्याचा आंबा वृक्ष ठेकेदाराच्या मनमानी ने उध्वस्त होण्याच्या मार्गावर

फोंडाघाटच्या कित्येक आठवणींचा वारसा जपणारा जुना-जाणता किरमॅंगो वृक्ष

निसर्गाचा ऱ्हास, विकासाच्या आड नको! ग्रामस्थांमध्ये प्रचंड हळहळ

फोंडाघाट (प्रतिनिधी) : हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका आणि कित्येक आठवणींचा वारसा लाभलेले भले मोठे आंब्याचे झाड रुंदीकरणाच्या नावाखाली लवकरच तोडले जाणार आहे. हे झाड किऱ्याचा आंबा तथा किरमँगो वृक्ष म्हणून प्रसिद्ध असून त्याच्या समोरील पटांगण किरमँगो स्टेडियम म्हणून आजवरच्या क्रीडा प्रेमींमध्ये सर्वश्रुत आहे. याच पटांगणाचा साक्षीदार असलेल्या ह्या वृक्षाने या मैदानावर गेली दोन-तीन पिढ्या मधील खेळाडूंना बागडताना-खेळताना पाहिले आहे. तर शेकडो पशु-पक्षी, पाथेयांना आपला आसरा दिला आहे. होऊ घातलेल्या भांडवली विकासाच्या करवतीने-कुऱ्हाडीने हे झाड लवकरच शहीद होणार असल्याचे कळते. त्यामुळे फोंडावासियांनी आपल्या भावना व हळहळ व्यक्त केली असून, आठवणींचा वारसा लाभलेल्या या झाडासाठी मानवाच्या बुद्धीला अखेरची साद घालत निसर्ग भकास करून विकास नको? अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वस्तुतः महाराष्ट्र झाड संरक्षण व जतन कायदा २०२१ प्रमाणे महाराष्ट्र सरकारने ५० वर्षाहून अधिक वय असलेल्या झाडांना वारसा वृक्ष – हेरिटेज ट्री म्हणून दर्जा दिला आहे. अशा झाडांची कत्तल करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाईची तरतूद केली आहे. मात्र निखिल कन्स्ट्रक्शनच्या लगतची झाडे तोडणारा ठेकेदार सरसकट सगळी झाडे कापत चालला आहे. या गोष्टीची ठेकेदाराने दखल घेणे अत्यावश्यक आहे.

नांदगाव ते फोंडा तिठा ते घाट रस्त्याच्या कडेला असलेली शेकडो वर्षापूर्वीचे वड, पिंपळ, आंबा अशी मोठमोठी रान झाडे तोडून, कापून त्याची ठेकेदाऱ्यांनी विल्हेवाट लावली आहे. तर झाडांचा शाकार फांद्यापाने लगतच्या कब्जेदाराच्या जागेत टाकले आहेत. त्यांना त्याचा त्रास व आर्थिक भुर्दंड भोगावा लागत आहे. विकासाच्या उंबरठ्यावर जिल्ह्याच्या वेशीवरील गाव फोंडाघाट, गेल्या वर्षीचा बाजारपेठेतील सुदृढ गटारहा पादचारी पथ यांच्या माध्यमातून सुमारे एक कोटी ७७ लाखाचा विकास पाहिल्यानंतर, चालू वर्षी हा देवगड ते हैदराबाद महामार्गाचा हजारो कोटी रुपयांच्या विकासाचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. विकासाच्या शोधात असलेल्या फोंडावासियांनी मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि निसर्गाचा विध्वंस करून केलेला विकास फोंडावासीयांना पचनी पडण्यास काही काळ वर्षे जावे लागणार आहे हे मात्र नक्की.

निखिल कन्स्ट्रक्शनचे कुर्मगतीने चाललेले रुंदीकरण रस्ता गटारी इत्यादी कामे सुरू असताना, रस्त्यालगतची वर्षानुवर्षापूर्वीची झाडांची कत्तल पोटकॉन्ट्रॅक्टर कडून बिंदिकत सुरू आहे. यामध्ये निसर्गाचा मुलाहीजा ठेवला जात आहे? ना लगतच्या कबजेदारांचा? ठेकेदार मात्र कापलेली, तोडलेली झाडे कसायाप्रमाणे परस्पर विकून मलीदा लाटण्याचा प्रयत्न राजरोस दिसतो. तोडलेल्या लाकडांचे गोडाऊन, टेंडर, इत्यादी बाबींबाबत कोणतेही उत्तर देत नाही. सगळा गौडबंगाल आणि हम करे सो कायदाss गॉडफादरच्या आशीर्वादाने निसर्ग बोडखा करण्याचा प्रयत्न फोंडावासीय अनुभवत आहेत आणि याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. याचा वरिष्ठ पातळीवरून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विचार होणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!