वैभववाडी (प्रतिनिधी) : नावीन्यता हीच विकासाची गुरुकिल्ली असून बदलत्या जगतील परिस्थितीत नव्या कल्पना आणि संशोधनाला विशेष महत्व आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील माजी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्च तर शिक्षा अभियान अंतर्गत (PM-USHA) “वाणिज्य आणि व्यवस्थापन : उदयोन्मुख प्रवाह व नवोपक्रम २०२६” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. बोलत होते. परिषदेच्या पहिल्या सत्रात सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर माजी प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर यांनी “वाणिज्य आणि व्यवस्थापनातील उदयोन्मुख प्रवाह” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात विद्या प्रबोधिनी महाविद्यालय बारदेश गोवा प्रा. आर. यू. म्हामल यांनी “पाणी हाच शाश्वत विकासाचा पाया” या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. तिसऱ्या सत्रात कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा प्रा. डॉ. सुवर्णा देऊस्कर यांनी “उद्योग क्षेत्रातील आजचे प्रवाह” या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे विश्वस्त मा. शरदचंद्र रावराणे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. नामदेव गवळी, उपप्राचार्य प्रा. डॉ.मारूती कुंभार, कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे, IQAC समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर सिरसट, PM USHA समन्वयक डॉ. किरण पाटील, तसेच सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मारुती कुंभार यांनी केले तर प्रा. रणजित पाटील यांनी आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. निलेश कारेकर यांनी केले. परिषदेमुळे विद्यार्थ्यांना व संशोधकांना वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या प्रवाहांची उपयुक्त माहिती मिळाली.












