सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : काजू हंगाम 2026 अनुषंगाने आयोजित समन्वय बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने यशस्वीपणे पार पडली. बैठकीस प्रमुख उपस्थिती मनीष दळवी (जिल्हा बँक अध्यक्ष तथा काजू बोर्ड संचालक, महाराष्ट्र राज्य) यांची लाभली. सदर बैठक तुळशीदास रावराणे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्ह्याचे उपनिबंधक बाळ परब, पणन मंडळ अधिकारी, मा. श्री प्रसाद पाटकर (बाजार समिती उपसभापती) तसेच संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
यावेळी मनीष दळवी यांनी काजू बोर्डाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच उद्योजकांच्या विविध समस्या ऐकून घेत त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सभापती तुळशीदास रावराणे यांनी बाजार समितीचे कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच येत्या काजू हंगामात पारदर्शक व्यवहार, शेतकऱ्यांना योग्य दर आणि बाजार समितीच्या नियमांचे काटेकोर पालन यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पणन मंडळ अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक बाळ परब यांनी सर्व व्यापारी व उद्योजकांनी वैध परवाना घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले.
तसेच सर्व व्यापारी व उद्योजकांच्या वतीने महाराष्ट्र अध्यक्ष, काजू असोसिएशन सुरेश बोवलेकर यांनी येत्या हंगामात बाजार समितीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हंगामादरम्यान बाजार समितीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेवटी उपसभापती प्रसाद पाटकर यांनी उपस्थित सर्व व्यापारी, उद्योजक व शेतकरी बांधवांचे आभार मानले व काजू हंगाम 2026 सुरळीत, पारदर्शक व यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.











