माजी सभापती अशोक बागवे व भाजप नेते प्रकाश मेस्त्री यांची विभाग नियंत्रकांकडे मागणी
आचरा बोरीवली एस टी बस बाबत सकारात्मक चर्चा
आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ आचरा देवगड एसटी बस गेल्या वर्षभरापूर्वी पासून अनियमित असून कुडाळ आगार, स्थानिक लोकप्रतिनिधी, अनेक ठिकाणी पाठपुरावा करुनही प्रश्न मार्गी लागत नसून या बाबत माजी सभापती अशोक बागवे व भाजप नेते प्रकाश मेस्त्री यांनी विभाग नियंत्रक दिपक गोडे
व विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांची भेट घेत निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ आगारातून चिंदर त्रिंबक मार्गे देवगडला जाणारी बस हि कुडाळ वरून संध्याकाळी ५ वाजता सुटते. तसेच देवगड वरून सकाळी ७ वाजता सुटते. अनेक दशके हि एसटी ची फेरी नियमित सुरु आहे. सदर फेरी ही सद्यस्थितीत अनियमित आहे. एक दिवस येते तर एक दिवस येत नाही, एखादा दिवस रद्द केली जाते हे आपण कंट्रोल चार्ट काढून पाहू शकता. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. सदर फेरी ही आचरा देवगडला जाणारी शेवटची फेरी आहे. सदर फेरी कणकवली वरून संध्याकाळी ०६.१५ वाजता सुटते. त्यापूर्वी कणकवली वरून संध्यासाठी ०५.३० वाजता कणकवली तळाशीत तोंडवळी ही बस सुटते. ०५.३० वाजल्यानंतर आपण कुडाळ देवगड गाडी रद्द केल्याने रेल्वेने मुंबई वरून येणा-या प्रवाशांची शेवटची गाडी रद्द केल्याने ती मिळत नसल्याने गैरसोय होते. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. गाडी रद्द केल्याने प्रवासी, विद्यार्थी यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या गाडीची फेरी पूर्वी प्रमाणे चालू ठेवावी.
तसेच मालवण-आचरा ही मालवण आगाराती गाडी दुपारी ०२.०० वाजता सुटावी. ही गाडी काहीवेळा रद्द केली जाते ती नियमित ठेवावी. असे निवेदनात म्हटले आहे. तसेच चिंदर भगवंतगड एसटी बस, आचरा कणकवली बोरीवली ही एसटी बस कणकवली स्थानकात सकाळी ५ वाजता येऊनही प्रवाश्यांना आचर्याला जाण्यासाठी ६.३० ते ७ पर्यंत ताटकळत राहावे लागते. कणकवली आगारातून होणारी मनमानी या बाबत मार्ग काढावा या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.












