कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षण, सहकार क्षेत्रातील कार्याने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी पद्मश्री डॉ डी. वाय पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले.त्यांच्यावर उद्या बुधवार ५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पद्मश्री डी .वाय पाटील यांनी बिहार,पश्चिम बंगाल,त्रिपुराचे माजी राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्राला संपूर्ण आयुष्य समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सुमारे दोनशे संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे व हजारो विद्यार्थी असा त्यांच्या कार्याचा विस्तार झाला . विशेषत: वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समुहासोबतच महाराष्ट्राचा नावलौकिक संपूर्ण देशात उंचावला. तसेच या महाविद्यालयांच्या माध्यमातून वैद्यकीय सोयी सुविधा व आरोग्य सेवेचे जाळे विस्तारले. राजकारणातही त्यांनी काम केले.ते राज्याच्या राजकारणात दोनदा विधानसभा सदस्य होते. डॉ. पाटील हे खऱ्या अर्थाने रमले ते शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात. यातून त्यांनी अनेक भव्य दिव्य अशी शैक्षणिक संकुले त्याचबरोबर डॉ डी.वाय.पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारखे प्रकल्पही साकारले. डॉ. पाटील हे सहकार, शिक्षण, सांस्कृतिक – साहित्यिक आणि सामाजिक चळवळीचे सच्चे आधारवड होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षण, सेवा आणि विनम्रतेची मूल्ये जपली. त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा, विनम्रतेचा आदर्श आणि समाजहिताची मूल्ये कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या जाण्याने एका दूरदर्शी शिक्षण महर्षीचा अंत झाला आहे.त्यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील.












