अंबाडी येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी) : हातात स्वप्नं घेऊन जगण्याची उमेद असलेल्या चिमुकल्या विधीचे २०२३ साली दुर्दैवी निधन झाले. भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील समीर ठाकरे यांच्या एकुलत्या एक कन्येच्या अकाली निधनाने ठाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या दुःखाला खचून न जाता विधीच्या स्मृती समाजसेवेच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवण्याचा संकल्प ठाकरे कुटुंबाने केला.
याच भावनेतून ‘विधी फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली. विधीच्या स्मृतिप्रीत्यर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना तसेच गरीब विद्यार्थ्यांना सातत्याने मदतीचा हात दिला जात आहे. गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, चप्पल, खाऊ तसेच विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते.
रक्तदानातून जपली मानवतेची नाळ
विधी फाउंडेशनच्या माध्यमातून अंबाडी येथील ज्ञानेश्वर मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे.
सलग चौथ्या वर्षी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
विधी फाउंडेशनचे हे चौथे वर्ष असून गेल्या चार वर्षांपासून संस्था आरोग्य क्षेत्रासह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने कार्यरत आहे. रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि गरीब-गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत अशा विविध माध्यमांतून फाउंडेशन समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहे.
विधी आज आपल्यात नाही; मात्र तिच्या आठवणींना समाजसेवेची जोड देत ठाकरे कुटुंबाने तिच्या स्मृतींना एक सकारात्मक आणि प्रेरणादायी रूप दिले आहे. एका कुटुंबाच्या दुःखातून सुरू झालेला हा समाजसेवेचा प्रवास आज अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवत आहे.
‘विधीच्या आठवणी… समाजसेवेच्या माध्यमातून सदैव जिवंत!’ हा संदेश देत विधी फाउंडेशनचा सेवाभावी प्रवास अविरत सुरू आहे.













