” आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार ” – केंद्रीय मंत्री नारायण राणे

कुडाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी मेळावा संपन्न

कुडाळ ( अमोल गोसावी ) : ” मी जनतेचा सेवक असून आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सुश्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज कुडाळ तालुक्यातील पावशी येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी मेळाव्यामध्ये केले.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अजून काही बाकी आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख ८ मागण्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठकीत चर्चा करून सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
आपण अधिकाधिक कर्मचाऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, ते माझे कर्तव्य आहे, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी रमेश करतसकर, स्वप्निल गोसावी, संदीप देसाई, अजित सावंत, स्वप्निल झोरे आदी उपस्थित होते.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जी सेवा केली ती कौतुकास्पद होती. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी माझे आहेत, मी माझ्या पदाचा वापर करून माझ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असा विश्वासही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त करा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषित बालकांचा प्रश्न गहन आहे. हा कुपोषणाचा प्रश्न सोडवणे अत्यंत महत्त्वाचे असून सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त करा, या समस्येकडे लक्ष द्या, अशी सूचना सुद्धा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढत असून विकासाच्या बाजूने राहिला तर सिंधुदुर्ग जिल्हा येत्या काळात देशात अव्वल बनेल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत अव्वल असून अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले करिअर घडवत आहेत. त्यामुळे विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने कोणतीही मदत करण्यास आपण तत्पर असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अजित सावंत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे येथे उपस्थित झाल्याने आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. आजचा दिवस हा क्रांतीचा दिवस आहे. या दिवशी आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्ही अशा व्यक्त करतो. ५९७ आरोग्यसेविकांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे प्रयत्न राहिले असेही ते म्हणाले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन स्वप्निल झोरे तर उपस्थितांचे आभार दयानंद कांबळे यांनी मानले या मेळाव्यास सिंधुदुर्ग तसेच अन्य जिल्ह्यातून आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!