विद्यामंदिर हायस्कूल येथे चित्रकला निबंध स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचे राज्य अर्थात छत्रपतींचे राज्य हे प्रत्येकाला स्वतःचे राज्य वाटत होते स्वराज्य वाटत होते. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सरकार हे स्वतःचे सरकार अस प्रत्येकाला वाटत आहे याच भावनेतून स्वराज्य सप्ताहाचे आयोजन केले आहे. स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने या आयोजित करण्यात आलेली निबंध व चित्रकला स्पर्धा ही विद्यार्थ्यांना छत्रपतींच्या कार्याची माहिती व्हावी व त्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत स्वराज्य संकल्पना पोहोचावी हा उद्देश आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले. स्वराज्य सप्ताहनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कणकवलीच्यावतीने विद्यामंदिर हायस्कूल येथे चित्रकला निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेल्फी विथ किल्ला समवेत अनेकांनी सेल्फीचाआनंद लुटला.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय विजयकुमार वळंजू, विद्यामंदिर मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका व्ही व्ही. जाधव, राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडूलकर, जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, प्रांतीक सदस्य विलास गावकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, बाळू मेस्त्री जिल्हा प्रतिनिधी सचिन अडुळकर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत वणवे, सिंगनाथ, जे.जे. शेळके, तवटे,सौ. शिरकर, गावकर, प्रसाद राणे, पी.पी.सावंत उपस्थित होते. स्पर्धेमध्ये विद्यामंदिरच्या सहाशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी अबिद नाईक पुढे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने जनसामान्यांच्या हिताचे घेण्यात आलेले निर्णय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. शासनाने शेती व त्या अनुषंगाने पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी मधाचे गाव सारखी योजना ही आणली आहे रस्ते विकासाच्या बाबतीत शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यात माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येणार आहे. फळ पिक विमा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. असे अनेक लोकाभिमुख निर्णय या सरकारने घेतले. सर्वसामान्य जनतेला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आपले सरकार वाटते. महाराष्ट्र राज्य सर्वच आघाड्यांवर नंबर एकचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचे सरकार अनेक लोकाभिमुख निर्णय घेत असून हे निर्णय म्हणजेच स्वराज्याच्या दृष्टीने सुरू असलेली वाटचाल आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करून विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमांना आपणा सर्वांचे मिळालेली साथ निश्चितच कौतुकास्पद असून आपण यापुढे अशीच साथ द्या.असे अबिद नाईक म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे सचिव विजयकुमार वळंजू म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित उपक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिताना किंवा चित्र रेखाटताना छत्रपतींचा शिक्षणाविषयीच्या दृष्टिकोन, शेती विषयक दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार पोहोचण्याचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे वळंजू म्हणाले.
यावेळी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या उपक्रमाचे कौतुक करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट केला .सूत्रसंचालन सिंगनाथ यांनी केले तर आभार विलास गांवकर यांनी मानले.



























