मुंबई (प्रतिनिधी) : माकड आणि वानरांचा कोकणात खूपच उपद्रव आहे. त्या साठी काय करायचे या साठी समिती नेमली होती. समितीने आता माकड व वानर यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे.याची जर का अंलबजावणी झाली तर कोकणात माकड व वानरांचा उपद्रव कमी होऊन येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
वानर, माकड हे प्राणी फळबागांचे नुकसान करतात. यात प्रामुख्याने कोकणात आंबा, काजू, केळी बागांचे, भाज्यांचे आणि घरांचे मोठे नुकसान होत असल्याने व काही प्रमाणात इतर शेतपिकांचे नुकसानही करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाकडे तक्रार केली तर त्याची फारशी दखल घेतली जात नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे.त्यामुळे अनेकांनी शेती करायची सोडून दिली आहे. रत्नागिरी येथील अविनाश काळे यांनी हा विषय गेले काही वर्षे पावून धरला आहे.त्यांनी उपोषण केले आहे. त्यानंतर शासनाने एक समिती नेमली होती. पंजाबच्या धर्तीवर कोकणात माकड व वानर यांचे निर्बीजीकरण करता येईल असा विचार या समितीने केला आहे.त्यांनी आता माकड व वानरांचे निर्बजीकरण करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे.महिष गुप्ता, मुख्य वनरक्षक, वन्य जीव नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली असून निर्बीजीकरणा ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी टास्क फोर्सची आहे.या बाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमीत करण्यात आला आहे .












