माजी आम. प्रमोद जठार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
अर्थ संकल्पीय अधिवेशनात स्मारकाची घोषणा आणि निधीची तरतूद करण्याची मागणी
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी महाराज यांना रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा येथे अटक होऊन पुढे त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या ठिकाणी शंभूराजे यांना अटक झाली त्या कसबा संगमेश्वर येथे धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक भवन बांधण्यात यावी, अशी जनतेची भावना आहे. याचा विचार करून कसबा येथे संभाजी महाराज यांचे स्मारक निर्माण करण्यात यावे. याद्वारे हा इतिहास सतत येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक राहील, अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कसबा इथून सुरुवात केल्यास पुढे कारभाराटले येथे म्हाळोजी घोरपडे यांचे समाधीस्थान, त्याच्याजवळच अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले शिवमंदिर, शृंगारपूर येथे महाराणी येसूबाई यांचे माहेर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजेंच्या वास्तव्याने पावन झालेले कसबा हे गाव अशी एक ऐतिहासिक मार्गिका या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचा फायदा पर्यटनासाठी आणि अर्थकारण बदलण्यासाठी होऊ शकतो. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत बहुमूल्य ठेवा, असे याचे वर्णन करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. या स्मारक स्थळी Statue of Sacrifice नावाने धर्मवीर संभाजी महाराजांचा भव्य पुतळा बांधण्यात यावा. सोबतच वस्तुसंग्रहालय आणि संदर्भग्रंथ वाचनमाला, ध्वनी-प्रकाश कार्यक्रम, Landscape Garden, भवानी मातेचा पुतळा आणि छोटेखानी मंदिर, एमटीडीसी चे विश्रांतीगृह (रिसॉर्ट), अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांचे फूड कोर्ट, Music Fountain, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी Amphitheatre तसेच व्हीआयपी विश्रांतीगृह बांधण्यात यावे, अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या वेगळ्या स्मारकाची घोषणा व त्या करिता निधीची तरतूद करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.