शेती करण्यासाठी देवगड किसान मोर्चा जमीन उपलब्ध करून देणार
तरुण बेरोजगारांनी प्रतिसाद द्या: डॉ. भाई बांदकर
देवगड (प्रतिनिधी) : भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. भाई बांदकर यांच्या संकल्पनेतील तरुण बेरोजगारांनी स्वतंत्र किंवा सामुदायिक भातशेती करावी हा उपक्रम शेती मार्गदर्शन व बियाणे वाटपाने सुरु झाला. ॲड.अजित गोगटे व सागर इव्हेंटस् देवगड यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये डाॅ. भाई बांदकर यांनी उद्देश व उद्दिष्ट स्पष्ट केले ते म्हणाले कोकणात नोकरी धंदे नाहीत ही ओरड नेहमीच केली जाते पण आंबा, मस्य व्यवसायाबरोबरच भातशेती हा अल्प किंवा बिन भांडवलात करता येणारा व्यवसाय आहे. शासनाकडून बियाणे मोफत दिले जाते, वापरासाठी अवजारे दिली जातात तर ज्यांच्याकडे भात शेतीसाठी जमीन नाही त्यांना किसान मोर्चा देवगड जमीन विनाशुल्क उपलब्ध करून देणार आहे.मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाद्वारे नविन आधुनिक शेतकरी उभे करण्याच्या या उपक्रमास तरुण बेरोजगारांनी प्रतिसाद द्यावा जेणे करून महाराष्ट्र भर असा उपक्रम कार्यरत करता येईल असे आवाहन किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.भाई बांदकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. अजित गोगटे यांनी या उपक्रमास शुभेच्छा देताना देवगडमधील जास्तीत जास्त तरुणांनी व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यास सुचविले, तसेच जशी भात शेतीची पडीक जमिन वापरात आणताय तशी किनारपट्टीची खारपड जमीन वापरात आणावी असे त्यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना सुचविले.
कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट केल्याबद्दल सागर इव्हेंटस् चे सागर बांदकर व किसान मोर्चा देवगडचे सचिव संतोष जुवाटकर यांचे कौतुक केले.
शेती मार्गदर्शक कृषीतज्ज्ञ श्री. विजय शेट्ये यांनी शेती कशी करावी व त्यात येणाऱ्या अडचणींवर शास्त्रोक्त पध्दतीने मार्गदर्शन केले, प्रोजेक्टवर क्लिप्स व व्हिडिओ दाखवून सविस्तरपणे नागरिकांचे शंकानिरसन केले.
देवगड तालुक्याचे कृषी अधिकारी श्री. भोसले व श्री.घाडगे यांनी शासनाच्या शेती विषयक योजनांचे मार्गदर्शन केले व लोकांच्या तक्रारीचे निरसन केले, शासनाच्या धोरणानुसार व कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भातशेती केल्यास नुकसान होत नाही हे आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमास किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.उमेश सावंत, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.उष:कला केळुस्कर, तालुका अध्यक्ष श्री.संतोष किंजवडेकर, श्री.चारुदत्त सोमण, श्री.गणेश सागवेकर, श्री.प्रसाद भोजने, सौ.प्रिती देवधर, श्री.अमोल कोयंडे उपस्थित होते.
त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते भातशेती बियाण्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रायोगिक तत्वावर साठ किलो बियाण्याचे वाटप करण्यात आले, यापुढे ज्या शेतकऱ्यांना बियाणे हवे असल्यास कृषी ऑफिस देवगड किंवा कट्टा तिठ्यावरील किसान मोर्चा ऑफिसमधुन घेण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जुवाटकर व आभार प्रदर्शन सौ.उष:कला केळुस्कर यांनी केले.










