खारेपाटण (प्रतिनिधी) : मध्यप्रदेशातील गाव बरांज ता. जयसिंगपूर जि.सेहडोल येथील कोल आदिवासी समाजातील मनोरूग्ण युवक अज्जु कोल याचे विरारफाटा येथील समर्थ आश्रम द्वारे नुकतेच कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले. अज्जु कोल याचा भाऊ संतोष कोल यांनी समर्थ आश्रमात येवून अज्जु यास नुकतेच ताब्यात घेतले. मुंबईतील बांद्रा येथील बिकेसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वरीष्ठ पोलीस निरिक्षक विजयकुमार शिंदे व पीएसआय कीर्ती जाधव यांनी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब व सेंटर इन्चार्ज संपदा सुर्वे यांचेशी संवाद करून अज्जु हिरायु कोल अंदाजे वयः२५ यास दि.१४ जुन,२०२४ रोजी आश्रय आणि सुरक्षिततेकामी जीवन आनंद संस्थेच्या सांताक्रुज येथील कार्व्हर डे नाईट शेल्टरमधे दाखल करण्यात आले होते.
अर्जुन हा मध्यप्रदेशमधील कोल आदिवासी समाजातील युवक असून मानसिक दृष्ट्या कमजोर मुलगा कामासाठी मित्राबरोबर मुंबईत आला आणि मित्रांपासून हरवला व भरकटला. दि.१४ /०६/२०२४ रोजी त्याला बीकेसी पोलीस स्टेशन द्वारा आधी जीवन आनंद संस्थेच्या सांताक्रुज येथील कार्व्हर डे नाईट शेल्टरला दाखल करण्यात आले. संस्थेतून नंतर त्यास विरारफाटा येथील समर्थ आश्रमला पाठवण्यात आले. कार्व्हर डे नाईट शेल्टर हे मुंबई महापालिकेद्वारे केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय शहरी बेघर निवारा केंद्र योजनेद्वारे चालविण्यात येणारे केंद्र आहे. जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी गुगल सर्चद्वारे प्रयत्न करून मध्यप्रदेशातील बेव्हारीचे आमदार शरद कोल, अखेतपूर ता.बेव्हारी च्या सरपंच रमाबाई पटेल,जामुनी ग्रामपंचायत सदस्य राकेश मिश्रा, पुजा कुमारी सरपंच बोरांझ यांचेसह ग्रामपंचायत बरांज ता.जयसिंगनगर जि.सेहडोल च्या सरपंच विमला कोल यांच्या मुलाशी संवाद केला.
विमला कोल यांच्या मुलाने अज्जु कोल यास ओळखले व अज्जुची आई सम्मरिया व भाऊ संतोष यास अज्जु समर्थ आश्रमात सुखरूप असल्याचा निरोप दिला. मधल्या काळात अज्जुचा आई आणि भावाशी व्हिडिओ काँलद्वारे संवाद झाला.दि.१९ जुलै,२४ रोजी संतोष कोल यांनी समर्थ आश्रममधे येवून अज्जु कोल यास ताब्यात घेवून मध्यप्रदेशातील गावी नेले. संस्थेचे कार्यकर्ते भाईदास माळी,संपदा सुर्वे,दिपाली मेघामाळी, दिपक अडसुळे ,चंदा छेत्री व हेमलता पवार यांनी अज्जु कोल ची आश्रमात विशेष काळजी घेवून देखभाल केली.












