पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती
ओरोस (प्रतिनिधी) : शासन कोणत्या जिल्ह्यात कोणता विकास करणे गरजेचे आहे ? हे अभ्यासून त्यानुसार विकासावर भर देत आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यासाठी पर्यटन विकासासाठी भर देवून रोजगारासाठी येथून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी भर देण्यात येणार आहे. पर्यटनदृष्ट्या रिक्षा चालकांना प्रशिक्षण देण्याचे काम शासन करणार आहे. जिल्ह्यातील स्वच्छ्ता अबाधित राखतानाच आरोग्य सुविधा मजबूत केल्या जातील. तसेच धार्मिक पर्यटनावर भर दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यातील जनता दरबार शुक्रवारी पार पडला. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनरक्षक नवल किशोर रेड्डी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.