गेला महिनाभर नळाला पाणीच नाही
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील आयनल गावातील सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेच्या नळाला गेले महिनाभर पाणीच आलेले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लेखी निवेदन देऊन 15 ऑक्टोबर ला घागर मोर्चा काढणार असल्याचे कळविले असल्याची माहिती सुनील ओटवकर यांनी दिली.
गेला महिनाभर म्हणजे ९ सप्टेंबर पासून ते अगदी आजपर्यत एक दिवसही नळाला पाणी आले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,श्री गणेश चतुर्थी, नवरात्र उत्सव,दसरा अशा मोठ्या सणांनाच योजनेचे पाणी पूर्णता बंद होते. यामुळे या नळयोजनेचा आम्हाला उपयोग काय? तरी नळपाणी पुरवठा सुरळीत न केल्यास १५ ऑक्टोबर रोजी आयनल ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आयनल येथील सुनील ओटवकर यांनी दिलेला आहे.
यांनी दिलेल्या निवेदनात सुमारे 55 ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या असून संपूर्ण गावात सुमारे 90 नळधारक ग्राहक आहेत. याबाबत ग्रामपंचायती कडून माहिती घेतली असता, म्हणाले की, ऐन पावसाळ्यात पाणी पुरवठा होणाऱ्या विहिरीतील पाईप पूर्णतः बंद (चोक अप) झाली. पावसाळ्याचे पाणी असल्याने विहिरीतील गाळ काढणे शक्य होत नाही. ग्रामस्थांची गैरसोय होतेय, ही वस्तुस्थिती असली तरीदेखील पावसामुळे आम्हालाही काम करणे शक्य होत नाही.