वागदे केंद्रस्तरीय बाल क्रीडा ज्ञानी मी होणार स्पर्धेचे वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते उदघाटन
कणकवली (प्रतिनिधी) : शालेय क्रीडा स्पर्धेतून उद्याचे क्रीडापटू घडतील. खेळ विद्यार्थ्यांचे मनगट मजबूत करते तर अभ्यासाने मस्तक मजबूत होते.अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या खेळात प्राविण्य मिळवून आपले व्यक्तीमत्व विकसित करावे असे प्रतिपादन वागदे सरपंच संदीप सावंत यांनी केले. वागदे केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उदघाटन वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते सातरल कासरल जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर करण्यात आले. त्यावेळी सावंत बोलत होते. यावेळी कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, सातरल सरपंच सविता मेस्त्री, कासरल सरपंच स्नेहा परब, केंद्रप्रमुख अनंत राणे,सातरल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप श्रावनकर, मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत, क्रीडाप्रमुख अपूर्वा सावंत, शिक्षक पालक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी गवस म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबत मैदानी खेळांत आपले प्राविण्य मिळवावे आणि स्वतःचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाकडून असे महोत्सव साजरे केले जातात. या स्पर्धांतून विद्यार्थ्यांचे सुप्त कौशल्य वाढीस लागते.














