मंत्री भरत गोगावले यांनी वायफळ वक्तव्य करताना महायुतीचे भान ठेवावे- दिलीप तळेकर

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात आणि जिल्ह्यातही आपण महायुती सरकारमध्ये आहोत. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वाटेल ती वक्तव्य करून महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी वक्तव्य करताना महायुतीचे भान ठेवून वक्तव्य करावे, असे भाजपाचे ग्रामीण तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी म्हटले आहे.

नारायण राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच यशस्वी माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेले नेते आहेत. भरत गोगावले यांनी सर्वप्रथम नारायण राणे यांचे कार्य व कर्तुत्व समजून घ्यावे. केवळ प्रसिद्धीसाठी वाटेल ती वक्तव्य करून महायुतीमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही. अशा प्रकारचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी योग्य समज देण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती मधील सर्व पक्ष एकत्रितरीत्या काम करत असताना श्री गोगावले यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आहे, असेही तळेकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!