कोल्हापूर (प्रतिनिधी) : सन २०३० पर्यंत संपूर्ण भारत टी. बी. मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. या अंतर्गतच, ‘माझं कोल्हापूर, क्षय मुक्त कोल्हापूर’ ही संकल्पना घेऊन संपूर्ण जिल्हा टी. बी. मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून सध्या त्याचे दृश्य परिणाम दिसून येत आहेत. जिल्ह्यातील आजरा, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील ९४ ग्रामपंचायती या पूर्णता क्षयमुक्त झाल्या आहेत. या ग्रामपंचायती बरोबरच संपूर्ण कोल्हापूर जिल्हा लवकरच क्षयमुक्त करण्यात येईल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
गारगोटी येथील इंदुबाई संस्कृती हॉल येथे टी. बी. मुक्त ग्रामपंचायत – २०२४ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, आजरा राधानगरी व भुदरगडचे गटविकास अधिकारी अनुक्रमे सुभाष सावंत, डॉ. संदीप भंडारे, डॉ. शेखर जाधव आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले नागरिकांनी टी. बी. ची अनावश्यक भीती बाळगू नये. आज ९४ गावातील सरपंचांचा सत्कार झाला आहे. ही बाब अत्यंत कौतुक व अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी ग्रामविकासासाठी मतभेद विसरून एकत्रित येवून काम करावे. ग्रामविकास कार्याला आपण सर्वतोपरी सहाय्य करू अशी ग्वाही देत राज्यात, जिल्ह्यात योग संस्कृती वाढावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आबिटकर यांच्या हस्ते निक्षय पोषण आहार किटचे वाटप तसेच आजरा, राधानगरी व भुदरगड तालुक्यातील सुमारे ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा महात्मा गांधीं यांचा पुतळा, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
तत्पूर्वी सर्वसामान्य लोकांमध्ये टी. बी. या रोगाबद्दल व्यापक जन जागृती व्हावी या उद्देशाने हे टी. बी. मुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत असल्याचे भुदरगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन यांनी प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी कल्याण निकम, अमोल पाटील, शिवाजी चौगुले तसेच विविध ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व आरोग्य विभागाचे इतर अधिकारी – कर्मचारी त्याचबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












