जिल्ह्यात लवकरच कोमसाप तर्फे साहित्य संमेलन – रणजित देसाई

को. म. सा. प. कार्यकर्ता मेळावा व भाकरी आणि फूल जिल्हास्तरीय कविसंमेलन कुडाळ येथे उत्साहात संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे. या जिल्ह्यात अनेक साहित्यिक लेखक घडले आहेत. त्या सर्व लेखक साहित्यिकांचे संमेलन लवकरच घ्यावे. या संमेलनाची सर्व जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली जाईल. साहित्यिक कार्यकर्ता व कवी निर्माण करण्याचे काम अशा कार्यक्रमातून होत आहे हे कौतुकास्पद आहे, असे मत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी व्यक्त केले. कुडाळ संत राउळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग व शाखा कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व ‘भाकरी आणि फूल’ कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन श्री. देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कवी संमेलनाचे अध्यक्ष मालवणी कवी रूजारिओ पिंटो, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते अनंत वैद्य, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर, सुरेश ठाकूर, दीपक पटेकर,अभिमन्यू लोंढे, संदीप वालावलकर आदी उपस्थित होते.

कवी रूजारिओ पिंटो (राजधानी पुरस्कार), सुरेश ठाकूर (संपादित विभागातील विशेष पुरस्कार वि), ना. बा. रणसिंग (फादर स्टिफन पुरस्कार), वैशाली पंडित (अनंत काणेकर स्मृती पुरस्कार), वृंदा कांबळी (महिला साहित्य संमेलन समिती अध्यक्ष), संदीप वालावलकर (बांधकाम समिती सदस्य), अनंत वैद्य (समन्वय समिती सदस्य) यांचा कुडाळ शाखेच्या वतीने को. म. सा. प. पुरस्कार मिळाल्याबद्दल व केंद्रीय समितीवर निवड झाल्याबद्दल मान्यवरांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

उद्घाटक म्हणून बोलताना श्री. देसाई पुढे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य चळवळ आज वेगाने पुढे जात आहे. साहित्यिक, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्रात आज कुडाळ सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून लवकरच लेखकांचा साहित्यिक मेळावा संमेलन घेण्याचा विचार आहे. या संमेलनाला मान्यवरांना, निमंत्रित केले जाईल. सांस्कृतिक मंत्री व पालक मंत्री महोदयांचे मार्गदर्शन व सहकार्य घेवून संमेलन यशस्वी करूया असे सांगितले. जिल्ह्यात असे पहिलेच भव्य दिव्य लेखक साहित्यिक संमेलन भरवले जाईल असे ते म्हणाले. साहित्यिक कार्यकर्ता मेळावा, कवी संमेलन असे एकत्रित आयोजित करून एक चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे. त्याबद्दल खऱ्या अर्थाने कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग आणि कुडाळ शाखा यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक शाळेमध्ये साहित्यिकांनी, त्यांचे विचार आजच्या मुलांपर्यंत पोहोचावेत आणि एक नवीन पिढी तयार व्हावी या दृष्टीने आपण जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आपण या संदर्भात विनंती करू असे ते म्हणाले.

कोकण मराठी साहित्य परिषद संपूर्ण कोकण विभागात साहित्य चळवळ उत्तम प्रकारे पुढे येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाखा चांगले काम करत आहेत. साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलनाच्या माध्यमातून नवोदित साहित्य घडवण्याचे काम आम्ही करत आहोत. साहित्य संमेलन घेण्याचा विचार आहे असे अध्यक्षीय भाषणात को. म. सा. प. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके म्हणाले. कवी अनंत वैद्य यांनी तरूण पिढी आणि शालेय विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू ठेवून आज आपण एक वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे आणि हे काम कोकण मराठी साहित्य परिषदेने करावे आणि एक नवी पिढी घडवावी असे त्यांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडाळ तालुका अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा सहसचिव सुरेश पवार यांनी केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन स्नेहल फणसळकर यांनी केले. आभार संदीप साळसकर यांनी मानले.

यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष डॉ. दिपाली काजरेकर, स्नेहल फणसळकर, कोषाध्यक्ष गोविंद पवार, स्वाती सावंत, वृंदा कांबळी, सुरेश पवार आदींनी सहकार्य केले. साईप्रसाद वेंगुर्लेकर, भरत गावडे, विठ्ठल कदम, कमलेश ठाकूर, दीपक पटेकर, राजस रेगे, नकुल पार्सेकर, श्रावणी प्रभू, अर्चना जोशी, सुस्मिता राणे, वैशाली पंडित, रामदास पारकर, ऋतुजा सावंत-भोसले, प्रज्ञा मातोंडकर, मधुरा वझे, भरत ठाकूर, अर्चना जोशी, श्रावणी प्रभू, मंगेश बागवे, सानिका पालव, गोविंद पवार, स्वाती सावंत, सुरेश पवार, राजेंद्र गोसावी, मनोहर सरमळकर, प्रगती पाताडे, स्नेहल फणसळकर आदींनी भाकरी आणि फूल या कवी संमेलनामध्ये बहारदार कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे अध्यक्ष रूजारिओ पिंटो यांनी या संमेलनात आपल्या कविता वाचल्या व सहभागी कवींचे कौतुक केले. अशाप्रकारे कार्यकर्ता मेळावा व ‘भाकरी आणि फूल’ कविसंमेलनाची सांगता झाली.

error: Content is protected !!