कुडाळ (प्रतिनिधी) : बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी साने गुरुजी यांच्या 126व्या जयंतीनिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.प्रभात फेरीची सुरुवात शाळेच्या परिसरातून झाली. त्यानंतर MIDC परिसरातून मार्गक्रमण करत प्रभात फेरी कुडाळ बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचली व पुढे कुडाळ एस.टी. स्टैंड परिसरात रॅलीचा समारोप झाला. एस.टी. स्टँडजवळ सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र आल्यानंतर प्रा. नितीन बांबार्डेकर यांनी साने गुरुजी जयंतीचे महत्त्व सांगत उपस्थितांना संबोधित केले.
समाजाप्रती साने गुरुजीं सारखी सहृदयता व संवेदनशीलता असण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले. जगाला प्रेम अर्पण करणे हाच खरा धर्म आहे. त्या विचारांचा आपण स्वीकार करूया. पर दुःखे दुःखी व्हावे, पर सुखे सुखी व्हावे. अशी मानसिकता जपत समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी साने गुरुजींचे विचार व त्यांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेवून आजच्या समाजातील व्यक्तीनी वागण्याची गरज आहे. साने गुरुजींनी सांगितलेली संस्कृतीची शिकवण आज लहान मुलांमध्ये कुटुंबामध्ये रुजवली पाहिजे. साने गुरुजींनी सांगितलेली संस्कृतीची शिकवण आज लहान मुलांमध्ये, कुटुंबामध्ये रुजवली पाहिजे असे सांगत साने गुरुजींना मानवंदना दिली. या प्रभातफेरी दरम्यान “खरा तो एकची धर्म” तसेच “आता उठवू सारे रान” ह्या प्रार्थना म्हणत साने गुरुजींच्या विचारांचा जागर करण्यात आला. बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी शिक्षकवृंदातील प्रिया केटगाळे, मधुरा इन्सुलकर, प्रसाद कानडे, विश्वजीत डांगमोडेकर यांच्यासह इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रभात फेरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये साने गुरुजींच्या विचारांची ओळख निर्माण झाली असून सामाजिक मूल्ये व मानवतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश साध्य झाला आहे










