बांदा (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथिल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे गुरूवारी बांदा येथे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.एकाच दिवशी जया एकादशी,गुरूवार आणि श्री स्वामींच्या पालखीचे आगमन असा सुंदर त्रिवेणी सुयोग यंदा जुळून आला. सकाळी श्री विठ्ठल रखुमाईची नित्य पूजा तसेच श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
त्यानंतर पालखीचे मंदिरात आगमन झाल्यावर पालखी पूजनाचा कार्यक्रम झाला. रामचंद्र उर्फ बाळा पेडणेकर यांनी सपत्नीक श्री स्वामी पादुका पुजन केले.त्यानंतर आरती होउन प्रसाद वाटण्यात आला. पालखी 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी थांबली होती. यावेळी भाविकांनी नामस्मरण व भजन केले. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.










