मालवणी करंडकात पुणे मुंबई गोवा मधील 12 एकांकिकांचा सहभाग…

बबन साळगावकर; कुंभार,पोळेकर नार्वेकर,सामंत धोपेश्वरकर यांना कला गौरव पुरस्कार जाहीर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या “मालवणी करंडक” महोत्सवात मुंबई-पुणे आणि गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १२ एकांकिका सहभागी होणार आहे तर या महोत्सवाच्या निमित्ताने ५ जेष्ठ कलाकारांचा “कला गौरव” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यात सावंतवाडीतून सचिन धोपेश्वरकर कुडाळ तालुक्यातून अंकुश कुंभार मालवण भरड येथील सगुण पोळेकर वेंगुर्ला वडखोल येथील आनंद नार्वेकर कणकवली येथील भास्कर उर्फ भाई सामंत यांचा समावेश आहे, अशी माहिती आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वागत समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

दरम्यान या महोत्सवाचे औचित्य साधून त्या ठिकाणी तब्बल चार दिवस “फूड फेस्टिवल” चे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी महोत्सवाला साजेसा हा महोत्सव असणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पर्यटक व कलाप्रेमींनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन त्यांनी केले.

हा महोत्सव दिनांक २७ व २८ फेब्रुवारी व १ आणि २ मार्च या कालावधीत सावंतवाडी पालिकेच्या मेजर जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर रंगणार आहे. यात तब्बल १२ एकांकिका सहभागी झाल्या आहेत. याबाबतची माहिती या पत्रकार परिषद देण्यात आली. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल टेंबकर,
उपाध्यक्ष ऋजूल पाटणकर दादा मडकईकर, सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार सदस्य निरंजन सावंत,आनंद काष्टे, निखिल माळकर, प्रणव तारी, आदी उपस्थित होते.
यावेळी साळगावकर म्हणाले, सावंतवाडी शहराला संस्थानकालीन आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून सुरू असलेला “मालवणी करंडक महोत्सव” यावर्षी पुन्हा एकदा होत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकार घडावे व त्यांना व्यासपीठ निर्माण व्हावे हा उद्देश आहे. त्या पार्श्वभूमीवर २७ फेब्रुवारीला मॅड बॉक्स थिएटर मुंबई (ठोंब्या), २८ फेब्रुवारीला नाट्यसिंधू पुणे यांची (चित्रकथी), रंगवलय अंधेरी यांची (बार-बार), वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली यांची (पडीक), आघाझ द राय रायझिंग युथ यांची (लपंडाव) तर १ मार्चला अक्षर सिंधू साहित्य कला मंच, कणकवली यांचे (भरकाट), आयडियल इंग्लिश स्कूल नेरुर यांची (देवराई), प्रथा थिएटर यांची (अमृत्सपुत्र), श्री गोपाळ कृष्ण कला मंच, तळाशील यांची (वाघ्या) तर २ मार्चला जी.एस. प्रोडक्शन यांची (गाऱ्हाणा), मॅड बॉक्स थिएटर यांची (बोबड्या), अभियांत्रिकी कला मंडळ, रत्नागिरी यांची (तुकारामाची टोपी) आदी एकांकिका सादर होणार आहेत.

दरम्यान या महोत्सवाचे औचित्य साधून खवय्यांना विविध प्रकार खाण्याची संधी मिळावी व स्थानिकांना रोजगार मिळावा त्यासाठी त्या ठिकाणी “फूड फेस्टिवल” आयोजित करण्यात आला आहे. यात मालवणी पदार्थासह बिर्याणी, चायनीज, मोमोज, पिझ्झा असे विविध प्रकार त्या ठिकाणी पर्यटकांना व स्थानिकांना चाखता येणार आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन श्री.साळगावकर यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!