निधी संपल्याने गेले आठ दिवस काम बंद
मसुरे (प्रतिनिधी): मसुरे गावातून वाहणाऱ्या रमाई नदी मधील मार्गाचीतड येथील गाळ उपशाचे काम निधी अभावी थांबणार नाही. डिझेल साठी आवश्यक निधी मिळून थांबलेले काम तातडीने चालू होणार असल्या बाबतची ग्वाही माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी मसुरे देऊळवाडा येथे उपस्थित शेतकऱ्यांना दिली. सदर भागात गाळ उपशाचे चालू असलेले काम डिझेल साठी निधी नसल्याने गेले आठ दिवस बंद होते. याबाबत माजी जी.प. अध्यक्ष सरोज परब, माजी प. स. सदस्य महेश बागवे यांनी लक्ष वेधले होते. माजी खास. निलेश राणे याबाबत तातडीने दखल घेत मसुरे देऊळवाडा येथे भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी देऊळवाडा प्राथमिक शाळा येथे बोलताना डॉ निलेश राणे म्हणाले, मसुरे गाव हा केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांचा आवडता गाव आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. विकास कामाना निधी कमी पडणार नाही. परंतु विकास कामे आम्ही करणार आणि श्रेय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. इथले नाव घेण्या इतके मोठे नसलेले पुढारी तुमची कामे करून देतो म्हणून सांगतील पण त्यांच्या कडून ते होणार नाही. या भागातील प्रलंबित विकासकामे पूर्ण होण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे शेवटी ते म्हणाले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, देऊळवाडा सरपंच नरेंद्र सावंत, माजी जी. प. अध्यक्ष सरोज परब, माजी प. स. सदस्य महेश बागवे, विलास मेस्त्री,शिवाजी परब, अभ्यंकर, अशोक मसुरकर, बागायत माजी सरपंच निलेश खोत, यासिन सैय्यद, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मसुरे मार्गाचीतड येथे रमाई नदी मधील गाळ उपसा केलेल्या ठिकाणी माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी भेट देत पाहणी केली.
● तोपर्यंत धरणाच्या कामास प्रारंभ नको!
मसुरे देऊळवाडा येथे धरणाचे काम मंजूर असून संबंधित शेतकऱ्यांना किती आर्थिक मोबदला जमिनीचा मिळणार आहे याबाबत काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे मोबदल्याची पूर्ण रक्कम मिळाल्या शिवाय धरणाच्या कामास सुरवात करू नये अशी मागणी यावेळी जमीनदार शेतकऱ्यांनी केली. तसेच ठेकेदार दादागिरी करून ग्रामस्थांना धमकावत असल्या बाबत सुद्धा माहिती दिली.
● पन्हळकर टेंबवाडीत तीव्र पाणी टंचाई
देऊळवाडा पन्हळकर टेंबवाडी या भागात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. याबाबत येथील महिलांनी तातडीने उपाय योजना करण्या बाबत डॉ निलेश राणे यांच्याजवळ मागणी केली. लघु पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून अधिकारी वर्गाला ग्रामस्थांची भेट घेऊन पाणी टंचाई दूर होण्यासाठी काम करण्याचे आदेशच यावेळी डॉ निलेश राणे यांनी दिले. यावेळी देऊळ वाडा बौद्धवाडी स्मशानभूमी, तसेच रस्त्यांच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने महेश बागवे यांनी दिले. प्रस्ताविक महेश बागवे यांनी केले.