माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप
कार्यकारी अभियंत्यांनी १७ टक्के कमी दराची निविदा रद्द करून २ टक्के कमी दराच्या निविदेला दिली मंजुरी
सा.बां. विभागाचा “आका” कोण?
मा.आ. वैभव नाईक व शिवसेना शिष्टमंडळाने सा.बां.कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंत्यांना धरले धारेवर
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरवल शिवडाव दारीस्ते प्रजीमा-२५ या रस्त्यावर २/४०० किमी मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे या कामासाठी ६९ लाख ४२ हजार रु. मंजूर झाले आहेत.याकामाची निविदा एका ठेकेदाराने १७ टक्के कमी दराने भरली असताना त्या ठेकेदाराच्या निविदेत त्रुटी काढून २ टक्के कमी दराने निविदा भरलेल्या ठेकेदाराला हे काम मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर निविदा प्रक्रिया ३० दिवसांच्या आत पूर्ण करण्याबाबतचा शासन निर्णय असताना तब्बल ६ महिने उशिराने हि निविदा उघडण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी ठेकेदाराशी संगनमत करून हे काम मॅनेज केले आहे हे दिसून येते. सा.बां. विभाग सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा कुरण बनला आहे. गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागात एकही काम स्पर्धात्मक पद्धतीने झालेले नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचा आका कोण? त्याचा लवकरच आम्ही पर्दाफाश करू असा आरोप कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात पारदर्शकता आली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकास कामांच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार केला जात असल्याने आज कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हळवल येथील कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना कडक शब्दात जाब विचारला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड,नगरसेवक संकेत नाईक,विलास गुडेकर, महेश देसाई,रोहित राणे, हळवल माजी सरपंच दीपक गुरव, रवी सावंत,शिरीष घाडीगावकर आदी उपस्थित होते.शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने यावेळी कार्यकारी अभियंत्यांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. शिरवल शिवडाव दारीस्ते रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्याच्या कामातील १७ टक्के कमी दराची निविदा डावलून २ टक्के कमी दराने निविदा भरलेल्या ठेकेदाराला हे काम कसे काय देण्यात आले? त्यामुळे शासनाचे ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच निविदा वेळेत उघडली असती तर २०२६ च्या पावसाळ्या आधी हे काम पूर्ण होणार होते. या कामाची निविदा नोटीस क्र. ४१, ही १७/०३/२०२६ रोजी प्रसिद्ध झाली होती. सदर निविदा उघडण्याची दिनांक २५/०३/२०२६ होती परंतु, सदर निविदा ०१/०९/२०२६ रोजी उघडण्यात आली.निविदा प्रक्रिया ३० दिवसांच्या आत पूर्ण करण्याबाबतचा शासन निर्णय असताना हि निविदा उघडण्यास ६ महिने का लागले? त्याचबरोबर ५ पेक्षा जास्त ठेकेदारांनी निविदा भरली असेल तर त्या सर्व ठेकेदारांच्या उपस्थितीत निविदा उघडावी असा शासनाचा नियम आहे. या कामाची १० ठेकेदारांनी निविदा भरली असताना त्यांच्या समक्ष निविदा का उघडण्यात आली नाही? शासनाच्या सर्व नियमांना कणकवली कार्यकारी अभियंता हरताळ फासत आहेत. जुन्या कार्यकारी अभियंत्यांचे ऐकून तुम्ही हे करत आहात का? असे सवाल करत वैभव नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. त्यावेळी कार्यकारी अभियंता यांनी सरकार कडून निधी मिळत नाही असे सांगितले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती सरकार कडून निधी दिला जात नाही यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
शिरवल शिवडाव दारीस्ते रस्त्यावरील पुल बांधकामाच्या निविदा प्रकियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने या कामाची फेर निविदा काढण्यात यावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात पारदर्शकता ठेवावी अशी सूचना वैभव नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर मठ-कुडाळ-पणदूर-घोडगे या रस्त्याच्या कामाची निविदा देखील एकाच ठेकेदाराने भरली ती देखील १ ते २ टक्के कमी दराने आहे आणि त्या ठेकेदाराला ती निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्यातही भ्रष्टाचार झाला आहे. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते रेल्वेस्टेशन जाणारा रस्ता विनय राणे या ठेकेदाराने अर्धवट टाकला आहे. त्याविरोधात सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले आणि त्याच ठेकेदाराला पुन्हा ओरोस येथील धर्मादाय आयुक्त इमारतीचे ५ कोटीचे काम देण्यात आले आहे. त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार सुरु असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला.
ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, काही रस्त्यांच्या दुतर्फा झाडी वाढल्याने अपघात होत आहेत. रस्त्यावर वृक्षलागवडीच्या कामातही भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदारांनी लावलेली झाडे मरून गेली असल्याचे वैभव नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.












