संविता आश्रमाचे संदीप परब यांना नॅशनल अवॉर्ड मिळावा असे त्यांचे कार्य ; श्रीपाद नाईक

संविता आश्रमाच्या नूतन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आ. वैभव नाईक यांच्या प्रति काढले गौरवोद्गार

आश्रमाला मदत करणे हे आपले कर्तव्य -आ. वैभव नाईक

खारेपाटण (प्रतिनिधी) : भगवे वस्त्र परिधान केले म्हणून कोण संत होत नाही. संत आपल्या कामाच्या माध्यमातून आणि समाजासाठी सर्वकाही करण्याच्या त्यांच्या कृतीतून संत म्हणून ओळखले जाते. संदीप परब हे वृद्धाश्रमाचा माध्यमातून जी सेवा देत आहेत.त्यामुळे ते संतच आहेत. असे मला वाटते. ८८५ निराधारांना त्यांनी सेवा देऊन त्यांच्या घरी पाठविले. त्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील मोठे योगदान लाभले. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.संदीप परब यांच्या कार्याचे वर्णन करण्यास शब्द कमी पडत आहेत.त्यांच्या या कार्याला नॅशनल अवॉर्ड मिळावा. प्रधानमंत्री यांची नक्कीच दखल घेतील असा विश्वास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सविता आश्रम येथील येथील कार्यक्रमात व्यक्त केला.

गेली अनेक वर्षे जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून निराधार बांधवांना पणदूर येथील संविता आश्रमामध्ये दाखल करून सेवा देत आहोत. आश्रित बांधवांना चांगल्या प्रकारे निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन इमारत उभारण्यात येत आहे या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. संविता आश्रमामधील अजून एका इमारतीसाठी आमदार वैभव नाईक यांनी २५ लाखाचा निधी दिला. या इमारतीचे देखील लवकरच काम पूर्ण होणार आहे. त्याबद्दल केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आ. वैभव नाईक यांच्या प्रति गौरवोद्गार काढत त्यांच्या हस्ते आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने देखील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

आश्रमाचे संस्थापक संदीप परब म्हणाले, म्हापसा एसटी स्टँड परिसरातील ६५ बांधव आम्ही आश्रमात आणले. आज ते व्यवस्थित नांदत आहेत. आतापर्यत ८८५ निराधारांना सेवा देऊन त्यांच्यावर उपचार करून सुस्थितीत करून त्यांना घरी पाठविले.आश्रमातील काही मुले बीएसी, बीकॉम झाली. काही मुले शिकत आहेत. वैभव नाईक यांच्या रूपाने आम्हाला चांगले आमदार लाभले. न मागता त्यांनी २५ लाखाचा निधी दुसऱ्या इमारतीसाठी दिला. त्यांचेही मोठे योगदान आश्रमाला लाभत आहे असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते,कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, माजी उपसभापती जयभारत पालव, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,बाळू पालव,पणदूर सरपंच पल्लवी पणदूरकर, श्री. साळकर, पोलीस पाटील देवू सावंत, जीवन आनंद संस्था अध्यक्ष नरेश चव्हाण, सचिव व आश्रमाचे संस्थापक संदीप परब, खजिनदार राम अडसूळे आदीसह संविता आश्रमाचे कर्मचारी, व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!