कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती
कुडाळ (अमोल गोसावी) : संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. शरद पवारांचा झंझावात आता थांबविता येणार नाही, शरद पवार यांना पुन्हा त्रास दिलात तर महाराष्ट्र तुम्हाला फिरू देणार नाही. साहेब, तुम्ही ज्यांना मोठे केले आज तेच तुम्हाला उन्हात, पुन्हा पावसात फिरायला लावत आहेत. आता तुम्ही एकदिलाने एकत्र या, हा पुरोगामी महाराष्ट्र जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला एक दिलाने शपथ घ्यावी लागेल की, साहेब आम्ही इथेच आहोत तुमच्यासोबत आहोत. आता महाराष्ट्र शरद पवार यांच्या हातात देवू अशी शपथ राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांना कुडाळ येथील मेळाव्यात दिली. यावेळी अजित पवार, दीपक केसरकर, भुजबळ यांच्यावर आव्हाड यांनी टीकास्त्र सोडले.
कुडाळ येथील मराठा हाॅल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी पक्ष निरीक्षक शेखर माने, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत , जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रसाद रेगे, व्हिक्टर डॉन्टस, रेवती राणे, नम्रता कुबल, सावली पाटकर, भास्कर परब, बाळ कनयाळकर, नझीर शेख, पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यास्थळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होताच ‘शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. या घोषणांनी कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षावर निवडून गेलात तेव्हा फुले-शाहू-आंबेडकर यांची नावे घेतली होती. मात्र, आता सत्तेत ज्यांच्याशी हातमिळवणी केलात ते लोक फुले, शाहू, आंबेडकर यांना शिव्या देत होते, हे उभा महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही, हे लक्षात ठेवा. कोकण ही साहित्यिकांची, सिनेकलावंतांची भूमी आहे. या महाराष्ट्राने सोन्यासारखी माणसे दिली आहेत. त्या भूमीला शरद पवार यांना आश्वस्त करायचे आहे. त्यासाठी आता तुम्ही सर्वांनी एकदिलाने एकत्र येऊन शरद पवार यांच्यासाठी प्रामाणिक काम करा, असे आवाहन केले.
म्हाताऱ्या बापाला कडी लावून घरात बसवण्याची आपली संस्कृती आहे का ? असा खडा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. २०१९ च्या निवडणुकीत आजारी असताना शरद पवार तुम्हाला प्रचारासाठी चालले ना?, असा अप्रत्यक्ष टोला अजित पवार यांना लगावला. कोकणशी शरद पवार यांचे अतुट नाते आहे. मच्छी, आंबा आणि शरद पवार हे अतुटच नाते असून ते तुटू शकत नाही. शरद पवार कोकणातील अणू रेणू जाणतात, असे आव्हाड म्हणाले.
महाराष्ट्रातही सत्तांतर होणार
राज्यात सत्तांतर नक्कीच होणार असून याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच आला आहे. कर्नाटकात भाजपची सत्ता तेथील लोकांनी लाथाडून पुन्हा काँग्रेसला सत्ता दिली. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र असो राजस्थान, मध्य प्रदेश येथे सुद्धा विरोधकांना दणका बसणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यावेळी मिळाले.
त्यांचे वय किती आहे हे महत्त्वाचे नाही तर कर्तुत्व महत्वाचे
शरद पवारांचे वय किती आहे हे महत्त्वाचे नाही तर कर्तृत्व महत्वाचे आहे. शरद पवार नसते तर मी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात दिसलो नसतो. मला राजकारणात पवार यांनीच आणले. त्यामुळे आज जे आमच्यातून वेगळे झाले त्यांनी विचार करावा. येत्या काळात जनता त्यांना बघून घेईल. यावेळी आव्हाड यांनी केसरकर यांच्यावरही टीकास्त्र सोडताना म्हंटले की, दीपक केसरकरांनी सांगावे की, शरद पवारांनी त्यांना किती मदत केली ते, परवा बघितले ना गाडी मागून धावत होते. हे पाहून लाचारांची हद्द झाली आहे. त्यांना माहीत आहे की शिंदे लवकरच जाणार असून आपले मंत्रिपद टिकविण्यासाठी ते अजित पवार यांच्याजवळ गेलेत, असा टोला सुद्धा केसरकर यांना लगावला.
तसेच यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले कि , जिल्ह्यात आता राष्ट्रवादी शिल्लक नाही म्हणणाऱ्यांनी दहा लोकांचा तरी मेळावा घेऊन दाखवावा , भविष्यात जर शरीर पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला किंवा माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर जर वेडवाकड बोलण्याचा प्रयत्न झाला तर त्याला त्या भाषेत नाही तर त्याच कृतीतून उत्तम दिल जाईल असा ईशाराही यावेळी अमित सामंत यांनी दिला.













