कणकवली (प्रतिनिधी) : नागवे-तांबळवाडी येथील प्रतिष्ठीत नागरिक दत्तात्रय काशिराम ढवण (वय ७८) यांचे सोमवारी सायंकाळी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.
दत्तात्रय ढवण हे मुंबईला बीएमसीमध्ये नोकरीला होते. सेवानिवृत्ती नंतर ते आपल्या नागवे गावी राहत होते. मीरा भाईंदर येथील नागेश्वर इंजिनिअरींग वर्क्सचे इंडस्ट्रीजचे संचालक दिलीप ढवण यांचे ते वडील होत. तसेच मैत्री परिवारातील सदस्या सौ.समीता मुंज-ढवण हीचे ते सासरे होत.
त्यांच्या निधनानंतर गेली अनेक वर्षे सावली सारखा त्यांच्या सोबत असणाऱ्या शिवा कुत्र्यांलादेखील आपला पोशिंदा गेल्याचे दु:ख अनावर होऊन त्या धक्क्याने शिवाने देखील त्यांच्या सोबत प्राण सोडला. यावरुन या दोघांमध्ये किती जिव्हाळ्याचे, अतुट नाते होते हे दिसून येते. एकाचवेळी घडलेल्या या घटनेनंतर अनेकांचे डोळे पाणावले आणि हळहळ व्यक्त करुन शोक व्यक्त केला.












