सावंतवाडी (प्रतिनिधी) : लोकसभेच्या रिंगणात राणे उतरताहेत हे लक्षात आल्यानंतर खासदार विनायक राऊत घाबरले आहेत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होवून त्यांच्या विरोधात विधाने करीत आहेत, असा प्रत्यारोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज येथे केला. दरम्यान सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आमची मोठी ताकद आहे. त्यामुळे दोन आमदारांच्या जीवावर राऊत कसे काय निवडून येणार? असा उलट सवाल त्यांनी केला. लोकसभा निवडणूक लढविण्यास राणे घाबरले, असा आरोप राऊत यांनी केला होता.
याबाबत सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी भाजपा लोकसभा निवडणूक लढणार आहे, कोण उमेदवार याचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत. परंतु राणेंचे नाव चर्चेत आहे त्यामुळे आता राणेंपुढे आपला काही पराभव लागणार नाही, हे लक्षात आल्यामुळेच राऊत घाबरले आहेत. ज्यांना पराभवाची भिती वाटते असेच लोक अशा प्रकारे विधाने करीत असतात. त्यामुळे त्यांच्याबाबत न बोललेच बरे, असे सावंत म्हणाले. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बैंक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, राजन राऊळ, अमित परब आदी उपस्थित होते.












