जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात “स्वच्छ माझे अंगण अभियान” राबवण्यात येणार

1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान राबवणार अभियान

सर्व कुटुंबांनी सहभाग घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांचे आवाहन

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात “स्वच्छ माझे अंगण अभियान” 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व कुटुंबांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे. शोषखड्डा, परसबाग, पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापन करीता कंपोस्ट खत खड्डा अथवा घरगुती खत खड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंडी या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होवून स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात “स्वच्छ माझे अंगण अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन (कुटुंबस्तर), सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तर) राबवत नित्य नियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगिकृत केली आहे. अशा कुटुंबाना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे अनुकरण करण्याकरिता इतर ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्या प्रमाणेच वैयक्तिक स्वरुपांच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी उद्युक्त करणे. हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकार देशमुख यांनी म्हटले आहे.

वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालयाची दैनंदिन स्वच्छता, शाश्वत स्वरुपात सर्व कुटुंब सदस्यांकडून वापर आणि ही सुविधा निरंतर टिकावी म्हणून आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यात कुटुंबांनी पुढाकार घ्यावा. कुटुंबस्तरावर दैनंदिन घनकच-याचे वर्गिकरण करणे, कुटुंबस्तरावर सुका कचरा, ओला कचरा कुंड्यामध्ये वर्गीकरण करणे. वर्गीकरण केलेल्या घरगुती कच-याचे कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा निर्मिती करुन कच-याचे, घर किंवा घराच्या परिसरातच व्यवस्थापन करणे. तसेच सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तरावर), परसबाग, पाझरखड्डा, शोषखड्डा याद्वारे घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन घर किंवा घराच्या परिसरातच करणे. आदी कुटुंबस्तरावरील प्रत्येक घटकाचे शास्त्रशुद्ध पध्दतीने व्यवस्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ माझे अंगण अभियान राबवण्यात येणार आहे.
या अभियानात उत्कृष्ट काम करणा-या कुटुंबांना 2 ऑक्टोबर 2024 रोजी श्रीफळ, पुष्प आणि प्रशस्तीपत्र देवून ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या अभियानात जिल्हा वासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मकरंद देशमुख यांनी केले आहे.

अभियान अंमलबजावणी कालावधीचे टप्पे
• अभियान कालावधी : 1/09/2024 ते 25/09/2024
• पडताळणी कालावधी : 26/09/2024 ते 30/09/2024
• पात्र कुटुंबांना लेखी स्वरुपात निमंत्रण देणे: 1/10/2024
• प्रशस्तीपत्र वितरण : 2/10/2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!