“सामाजिक संस्था या समाजाच्या रक्त वाहिन्या आहेत” – शिवकुमार डिगे, न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय
खारेपाटण (प्रतिनिधी) : “समाजातील निराधार वंचितासाठी,मानवतेसाठी मुलभूत कार्य करणा-या सामाजिक संस्था या समाजामधे रक्त वाहिन्यान सारखे काम करतात.या संस्थाना समाजाने पाठबळ दिले पाहिजे.असे भावपूर्ण उदगार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मान. शिवकुमार डिगे यांनी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या ३-या स्मृति दिनानिमित्ताने माई परिवाराने बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार-२०२५ प्रदान कार्यक्रमात बोलताना काढले.
संदिप परब यांची जीवन आनंद संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांना यावेळी न्यायमूर्ती डिगे यांचे शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी न्यायमूर्ती डिगे हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सिंधुताई सपकाळ यांनी स्वतःच्या जीवनात अनेक यातना सहन करीत त्यांचे सारे जीवन समाजातील निराधारांसाठी व्यतीत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना सिंधुताईच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी संदिपदादा परब यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा हातपाय सडलेल्या माणसांच्या जखमेतून किडे काढून त्यांना बरं करणारे, समाजाला नको असलेली माणसं सांभाळणारे संदिपदादाचे कार्य पाहून आपण अवाक् झाले. तीथेच आपली नाळ जोडली गेल्याचे ममता सकपाळ यांनी सांगीतले.
डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांचे महिला बालकल्याण, दत्तक विधान क्षेत्रातले स्नेहांकुर,रेड लाईट एरीयातील महिलांसाठीचे कार्य आणि त्यांची भावलेली विद्वत्ता, अनुभव यापुढे आपण विनम्र असल्याचे ममता यांनी म्हटले. बालगंधर्व रंगमंदिरात यावेळी संत न्यानेश्वर माऊलींनी रचलेल्या अभंग आणि ओव्यानवर आधारित सुश्राव्य आणि सुंदर असा निरूपण व संगीतमय कार्यक्रम सन्मिता धापटे-शिंदे आणि गणेश शिंदे यांनी सादर केले. माई परिवारासह राज्यातील निराधार वंचितासाठी कार्य करणा-या सामाजिक संस्थांना स्वावलंबी करण्यासाठी सतत धडपडणारे कल्याणी टेक्नोफोर्ज कंपनीचे एमडी रवी नगरकर, कृष्ण प्रकाश-महाराष्ट्र पोलीस प्रमुख ( फोर्स वन) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विनया देसाई यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन केले.
















