धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे मंत्र्याचे आश्वासन
वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा धरणग्रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प कृती समितीच्यावतीने मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मंत्री राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानी जाऊन अरुणा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा तसेच पुनर्वसन होऊन सहा वर्ष होत आली तरी अद्यापही अनेक प्रकल्पग्रस्तांना निवासी भूखंडाची ताबा पावती देण्यात आलेली नाही. तसेच ज्यावेळी संकलन रजिस्टर तयार करण्यात आले. त्यावेळी निवासी भूखंडासाठी अपात्र ठरलेल्या कुटुंबांना पात्र करून त्यांना निवासी भूखंडाची ताबा पावती देण्यात यावी. धरणग्रस्तांना पर्यायी शेत जमीन देण्याच्या दृष्टीने कारवाही करावी. आखवणे नागपवाडी पुनर्वसन गावठाणात अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी देण्यात यावे. पुनर्वसन गावठाणातील अपूर्ण नागरी सुविधा पूर्ण कराव्यात. पुनर्वसन गावठाणातील नवीन ग्रामपंचायत इमारत इतर शासकीय कार्यालयांसाठी जागा निश्चित करून त्यांचे बांधकाम करण्यात यावे. यासह अनेक प्रश्नांवर मंत्री राणे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. राज्यात आमचे सरकार आहे त्यामुळे धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येथील. आपण निश्चिंत राहा. असे आश्वासन मंत्री राणे यांनी अरुणा प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी डॉ जगन्नाथ जामदार रंगनाथ नागप, संतोष नागप,अभय कांबळे, तळेकर,मनोज नागप आदी उपस्थित होते.













