कणकवली (प्रतिनिधी) : शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सृजनशील मनात उत्तमोत्तम साहित्याची अभिरुची वाढावी तसेच त्यांना शिक्षण देणार्या शिक्षकांच्या अभिवृत्तीला चालना द्यावी या उद्देशाने सावडाव-नांदगाव संयुक्त केंद्रांच्या वतीने केंद्रशाळा सावडाव नं.१ येथे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत एक उपक्रम म्हणून या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावडाव-नांदगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीचे वाजत गाजत स्वागताने झाली. केंद्राचे केंद्रप्रमुख तथा स्वागताध्यक्ष सद्गुरू कुबल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, शारदापूजन आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. नांदगाव नं.१ च्या शिक्षिका प्रतिमा पोकळे यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीताचे सुस्वरात गायन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. केंद्रप्रमुख कुबल यांनी संमेलनाचे प्रास्ताविक करून आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी विचारमंचावर सावडाव गावचे ज्येष्ठ निवृत्त केंद्रप्रमुख र.स.कामतेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा प्रभुदेसाई, नांदगाव केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत,सावडाव केंद्रमुख्याध्यापिका सुप्रिया हर्णे, उच्चश्रेणी मुख्याध्यापिका श्रावणी जावकर, सर्व शिक्षा अभियानचे विषयतज्ज्ञ सचिन तांबे आदी उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांचे बहारदार कविसंमेलन संपन्न झाले. यामध्ये ओटव नं.१ च्या निधी गांवकर, स्वरा जाधव, समृद्धी तांबे, नांदगाव मधलीवाडी शाळेतील सलोनी शेलार, यशश्री मेस्त्री तर सावडाव नं.१ च्या आर्या वारंग, वेद प्रभुदेसाई या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे प्रभावी अभिवाचन केले, त्याचबरोबर केंद्रातील शिक्षक सुहास सावंत, प्रतिमा पोकळे, प्रियांका भोगले, सृष्टी सवादे, प्रतिक्षा तावडे, सचिन तांबे, मनोज पिळणकर आदींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून विद्यार्थ्यांना काव्यलेखनाची प्रेरणा दिली.
यावेळी अण्णा प्रभूदेसाई यांनी कविसंमेलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक कवींचे कौतुक करत आपल्या मनोगतातून सदिच्छा दिल्या. त्यानंतर माईण नं.१ च्या सहशिक्षिका कवयित्री सरिता पवार यांच्याशी साहित्य संवाद या सदरात निवेदक राजेश कदम यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. कवयित्री सरिता पवार पवार यांना त्यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेत याचा उल्लेख करून त्यांच्या स्त्रीविषयक जाणिवांचे एकेक भावविभोर कंगोरे मुलाखतीतून उलगडले. कवयित्री सरिता पवार यांनी बालपणापासून अनुभवलेला भवताल आणि सामाजिक वास्तवतेच्या दाहक अनुभवातून त्यांच्या संवेदनशील मनावर झालेले काव्यसंस्कार त्यांनी आपल्या सहजसुंदर प्रवाही मनोगतातून उपस्थितांसमोर व्यक्त केले. बाई ही केवळ सोशिक नसून ती इथल्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत राहते. तिला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हवे असते. तिच्या अभिव्यक्तीचे रिंगण तिच्या चारित्र्याच्याही पलिकडे ऐसपैस होत जाणे हेच तिचे खरे स्वातंत्र्य असते. असा विचार व्यक्त करत त्यांनी आपला आजवरचा काव्यप्रवास उलगडून दाखविला. यावेळी त्यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले काव्यपुरस्कार, विशाखा काव्यपुरस्कार आणि इतर मानाचे काव्यपुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दोन्ही केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.
केंद्रप्रमुख कुबल यांनी त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि साहित्यिक वाटचालीसाठी मनोगतातून सदिच्छा दिल्या.
अत्यंत प्रभावी, सुत्रबद्ध आणि निटनेटके आयोजन केल्याबद्दल र.स.कामतेकर यांनी गौरवोद्गार काढले. संमेलनाचे खास आकर्षण म्हणजे विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचा सेल्फी पाॅईंट ठरला. सर्व शिक्षकांनी आपली सेल्फी काढून आनंद लुटला. संमेलनाच्या प्रवेशद्वारावर अंगणवाडी सेविका रेश्मा शेटये, पालक प्रियांका प्रभुदेसाई, सायली मेस्त्री यांनी सुबक अर्थवाही रांगोळी रेखाटली. या संमेलनाचे संपूर्ण सूत्रबद्ध नियोजन आणि कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन राजेश कदम यांनी प्रभावीपणे केले. तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल आणि आभार नांदगाव नं.१ पदवीधर शिक्षक संतोष देसाई यांनी मानले. यावेळी दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.संमेलनाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील भूषण हर्णे, सचिन राणे, सुप्रिया शेंगाळ, भावना हर्णे, माया पवार,दिनेश जाधव,बजरंग मोहिते, लक्ष्मण राणे आणि इतर सहकारी शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले.













कवी संमेलनात कविता सादर करताना……..