दापोलीच्या कृषी संजीवनी गटाचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक, मार्गदर्शन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह शेतीच्या कामांनी जोर घेतला आहे. यादरम्याने कृषि महाविद्यालय, दापोलीच्या ‘ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत लोरे नं १ येथे आलेल्या ‘कृषिसंजीवनी’ गटाने शेतकऱ्यांपर्यंत सुधारीत तंत्रज्ञान पोहचविण्याचे काम हाती घेतले आहे.
प्रात्यक्षिके व माहितीपर तंत्राद्वारे हे साध्य होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानातील शेतकरी सक्षम करण्यासाठी या गोष्टीची जाणीव या कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे. तरवा तयार करण्यासाठी गादी वाफ्यांचा वापर, यंत्राद्वारे मशागत-चिखलणी याचबरोबर खालीलप्रमाणे काही प्रात्यक्षिके त्यांनी घेतली आहेत.
*१) गिरीपुष्प पाल्याचा शेतात उपयोग
- याद्वारे मातीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
- वजनाच्या ३-४% नत्र मातीत मिसळले जाते.
- रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.
२) यंत्राद्वारे चिखलणी - वेळ, पैसा व कष्ट याची बचत होते.
- उत्तम प्रतीचा चिखल तयार होतो.
- सोपी हाताळणी.
३) ओळबद्ध पुनर्लागवड - भात रोपे १५ सेमी × २० सेमी अंतर ठेऊन लावली जातात.
- प्रती रोप जास्त हवा, माती व सुर्य प्रकाश उपलब्ध होतो.
- आंतरमशागत सोपी होते.
- परीणामी जास्त उत्पन्न देणारे फुटवे येतात.
४) जैविक खतांचा वापर. - मातीचा कस टिकून राहतो.
- रासायनिक खतांवर अवलंबून रहावे लागत नाही. खर्च कमी होतो.
५) तरव्यासाठी गादी वाफ्यांचा वापर - मुसळधार पावसात देखील पाणी साठून न राहील्याने, भात रोपास इजा होत नाही.
- आंतरमशागतीची कामे सोपी होतात.
_कृषि महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाटचे प्रमुख डॉ. विजय शेट्ये, प्रा. डॉ. सचिन पाठक, डॉ. प्रशांत अहीरे, डॉ. विरेश चव्हाण, डॉ. परेश पोटफोडे, कृषि पर्यवेक्षक डॉ. देवू पवार, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रविण झगडे इतर विविध विषय विशेषज्ञांचे (SMS) मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.कृषिसंजिवनी गटामध्ये विभव सिनकर, रोहन वेळीप, अपुर्व आयनारकर, ॲरोन डायस, साईराज गावकर, प्रजय वराडकर, पियुष वाजे, सार्थक शिर्के व सिद्धार्थ जाधव यांनी सहभाग घेऊन प्रात्यक्षिक दाखवले.











