मालवण (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी निवती दीपगृहासमोर २५ वाव खोल समुद्रात बंद पडलेली मासेमारी नौका आणि त्यातील तिघा मच्छीमारांना सुखरूप दांडी समुद्रकिनारी आणल्याबद्दल बाबु तारी आणि बाबी तारी या दोघा मच्छीमारांचा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवती दिपगृहालगतच्या २५ वाव खोल समुद्रात एक मासेमारी नौका बंद पडली होती. समुद्रातील वातावरण खराब असल्याने नौकेतील मच्छीमारांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बाबू तारी व बाबी तारी या बंधूनी समुद्रात जाण्याचे धाडस दाखवीत त्या नौकेवरील तिन्ही मच्छीमारांना सुखरूप दांडी समुद्रकिनारी आणण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याची दखल येथील ठाण्याने घेत तारी बंधूंचा सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, सहाय्यक पोलीस सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी तारी बंधुंचे कौतुक केले. कोल्हे म्हणाले, शासकीय विभागांच्या गस्ती नौका सध्या कार्यरत नाहीत. त्यादिवशी समुद्रातील वातावरणही खराब होते. अशा परिस्थितीत तारी बंधु देवदुताप्रमाणे मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी मच्छीमारांचा जीव वाचविण्याचे मोठे काम केले आहे.