प्रकाश राजाराम पवार यांचे सुमारे १ लाख रुपयाचे नुकसान
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे पवारवाडी या गावातील शेतकरी प्रकाश राजाराम पवार यांच्या मालकीचा पवारवाडी येथे असलेला गुरांचा गोठा रविवार सकाळी अचानक ११.३० च्या दरम्यान लागलेल्या आगीत जाळून खाक झाला. गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे प्रकाश पवार यांचे सुमारे १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कुरंगवणे गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी पवारवाडी येथे घटनास्थळी तातडीने भेट देऊन प्रकाश राजाराम पवार यांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला.पवार यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली त्यावेळी सुदैवाने गोठ्यात कोणीच जनावरे नसल्याने कोणतीच जीवित हानी झाली नाही.मात्र या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला. सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी श्रीम.अग्निहोत्री यांनी अपघात स्थळी जावून घटनेची पाहणी केली.व नुकसान भरपाईची पंचयादी घालून तसा अहवाल वरिष्ठांना पाठवून दिला. यावेळी सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, ग्रामपंचायत सदस्य सौ विशाखा राऊत,ग्रामस्थ रवींद्र पवार,संदीप पवार आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.













