शिबिरातून मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा कुटुंबाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला करून द्या

पीएसआय मोहन चव्हाण यांचे युवकांना आवाहन

नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेतृत्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : समाज घडविण्यासाठी सक्षम नागरिक निर्माण होणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी अशी वैचारिक शिबिरे राबविली जाणे गरजेचे आहे. नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारे हे शिबीर युवकांमधील ‘स्व’ची जाणीव निर्माण करणारे आणि समाज घडविणारे आहे. या शिबिरातून मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा आपण आपल्या कुटुंबाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला करून द्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कार्यालयचे पोलीस उपनिरीक्षक पीएसआय मोहन चव्हाण यांनी केले. नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन आयोजित नेतृत्व विकास शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

पीएसआय मोहन चव्हाण

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली गोपुरी आश्रम येथे युवा नेतृत्व आणि विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पं. स. कणकवलीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन उईके, वैदिक गणित प्रशिक्षक कवयित्री रुपाली कदम, यारा फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वराज सावंत, यारा फाउंडेशनच्या प्रशिक्षक गार्गी कसालकर, रश्मी दाभोळकर, यारा फाउंडेशनच्या नीलम राणे, समीर परब, नेहरू युवा केंद्राचे कणकवली समन्वयक अक्षय मोडक, शुभ्रा देऊलकर, सहदेव पाटकर, अवंती कांबळे, श्रीहर्षा टेंगशे, सौरभ तळवडेकर, विल्सन फर्नांडिस, सुमन मोराळे आदी उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक

मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारताच्या संविधानाचेही पूजन करण्यात आले. नेतृत्व हे फक्त राजकीय कामांसाठी गरजेचे नसून ते सामाजिकही आहे. प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व आवश्यक आहे. कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरू केलेल्या गोपुरी आश्रमाच्या वास्तूत हे नेतृत्व शिबिर संपन्न होत आहे, याचा आनंद आहे. या शिबिरातून एक संपन्न विचार घेऊन बाहेर पडा, असे प्रतिपादन आम. वैभव नाईक यांनी केले. बालरोतज्ज्ञ डॉ. सचिन उईके यांनी या संस्कारमय शिबिराचा लाभ घेऊन युवकांनी व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन केले. आजकालच्या युवकांमध्ये नकार स्वीकारण्याची क्षमता असावी. प्रबळ इच्छाशक्ती असावी. पुढाकार घेण्याची तयारी असावी, तरच समाजात सकारात्मक बदल घडेल, असे श्री. उईके म्हणाले. वैदिक गणित तज्ज्ञ रूपाली कदम यांनी आजकालच्या मुलांनी राबविलेलं हे एक आशावादी शिबिर आहे. या शिबिराच्या माध्यमातून आपली एक वेगळी इमेज प्रस्थापित करूया, असे प्रतिपादन केले. यावेळी पंचायत समिती कणकवलीच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या.

वैदिक गणित तज्ज्ञ रूपाली कदम

नेहरू युवा केंद्राचे कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक यांनी नेहरू युवा केंद्र विषयी माहिती दिली. यारा फाउंडेशनच्या श्रेयश शिंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली तर आभार नेहरू युवा केंद्राचे देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल गुरव यांनी केले.

error: Content is protected !!