अग्निशामक बंब आणून आग विझवण्यासाठी केले प्रयत्न सुमारे साडेआठ लाखांचे नुकसान
आचरा (प्रतिनिधी) : सोमवारी दुपारी आडवली माळरानावर लागलेल्या आगीत घाडीवाडी येथील संजय पटेल यांच्या साॅ मिलच्या आवारातील चिरकामाचे लाखों रुपये किंमतीचे लाकूड जळून नुकसान झाले. आगीची तिव्रता ऐवढी होती की आग विझविण्यासाठी ग्रामस्थांसोबत कणकवली वरून अग्नीशामक बंब पाचारण करण्यात आले होते.
सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आडवली माळरानावर लागलेल्या आगीचा फटका पटेल साॅ मिलच्या आवारातील लाकडांना बसून लाकडांनी पेट घेतला .हि माहिती कामगारांकरवी समजताच आडवली ग्रामस्थ विनोद साटम, कृष्णा हर्णे, आबू कदम, अमोल कदम, अमोल घाडी, सुशांत साटम, अनिल घाडी, अरविंद साटम यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र दुपारची वेळ आणि सुटलेल्या वा-यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी कणकवली येथून अग्निशामक बंब बोलावण्यात आले. मात्र आगीच्या रौद्ररूपात लाकूड गिरणीवरील सुमारे अडीच लाखाचे शिवण लाकूड दहा टण, अंदाजीत सहा लाखाचे साधे लाकूड ३०टन जळून पटेल यांचे सुमारे साडे आठ लाखांचे नुकसान झाले. याबाबत सरपंच संदीप आडवलकर, तलाठी लक्ष्मण देसाई, ग्रामविकास अधिकारी युवराज चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद साटम यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.




















