स्वतःची सुरक्षितता ठेवणे ही प्रत्येक महिलेची जबाबदारी – डॉ. शुभांगी जोशी यांचे प्रतिपादन

चौके (प्रतिनिधी) : आज महिला व लहान मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. स्वतःची सुरक्षितता ठेवणे ही आपलीच जबाबदारी आहे. मुलींनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींकडून होणाऱ्या स्पर्शाबाबत जागरूक राहिले पाहिजे, कोणता स्पर्श चांगला कोणता स्पर्श वाईट हे मुलींनी जाणून घेणे व वेळीच ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मालवणच्या डॉ. शुभांगी जोशी यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रशाळेतील सखी सावित्री समितीच्यावतीने सशक्त नारी सशक्त समाज या विषयावर विद्यार्थिनी साठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी डॉ. शुभांगी जोशी या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर डॉ. गार्गी ओरोसकर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नरोना प्रशालीचे मुख्याध्यापक एच बी तिवले, पर्यवेक्षक आर डी बनसोडे सहाय्यक शिक्षिका सरोज बांदेकर पी जी मेस्त्री, सौ जे व्ही रेवणकर , आदी व इतर उपस्थित होते.

प्रारंभीबांदेकर यांनी प्रास्ताविक केले तर स्वागत मुख्याध्यापक तिवले यांनी केले. यावेळी बोलताना डॉ जोशी यांनी आपले शरीर ही आपली संपत्ती आहे, शरीरावर कशाही पद्धतीने स्पर्श करण्याचा अधिकारी कोणालाही नाही. एखाद्या स्पर्शामुळे आनंद वाटत असेल, छान वाटतं असेल तर तो चांगला स्पर्श असतो, तर ज्या स्पर्शाने आपल्याला राग येतो, घृणा वाटते, रडू येते असा स्पर्श वाईट स्पर्श असतो. हे स्पर्श मुलींनी ओळखणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ गार्गी ओरोसकर यांनी मुलींच्या समस्या तसेच आहार या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. शेवटी मेस्त्री मॅडम यांनी आभार मानले.

error: Content is protected !!