जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी घेतली निराधार महिलेची तात्काळ दखल
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मजासवाडी बस डेपो जवळ निराधार स्थितीत आढळून आलेली दक्षिण भारतीय अनोळखी महिला पदमा ( वय अंदाजे:५० ते ५५वर्षे ) हिला मेघवाडी पोलीस स्टेशन द्वारे सुरक्षितता आणि निवा-यासाठी नुकतेच विरारफाटा वरठापाडा येथील समर्थ आश्रमात दाखल करण्यात आले आहे.
जीवन आनंद संस्थेच्या जोगेश्वरी तील हितचिंतक श्रावणी परब यांनी एक निराधार अनोळखी महिला मजासवाडी बस डेपोजवळ असल्याची माहिती जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना दिली. संदिप यांनी निराधार आणि बेघर असलेल्या महिलेची तात्काळ दखल घेवून संस्थेच्या मुंबईतील कार्व्हर डे नाईट शेल्टर च्या इन्चार्ज संपदा सुर्वे यांना महिलेस आश्रमात दाखल करण्यासाठी सूचना केली व संपदा यांनी त्यानुसार जोगेश्वरीच्या मेघवाडी पोलीस स्टेशनशी समन्वय आणि पाठपुरावा करून महिलेला आश्रमात दाखल करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.
पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भरडे यांच्या पत्रानुसार महिलेची सुरक्षितता आणि निवा-यासाठी जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात दाखल करण्यात आले आहे. सदर महिला जास्त बोलत नाही.मात्र तिच्या थोड्याशा बोलण्यावरून सदर महिला ही दक्षिण भारतीय असल्याचा अंदाज संपदा यांनी व्यक्त केला आहे. महिलेचे नाव गाव व कुटुंब शोधण्यासाठी आश्रमचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.



