माजी आमदार वैभव नाईक यांचा घणाघाती आरोप
कणकवली (प्रतिनिधी) : वैभव नाईक यांचे सिद्धेश शिरसाट बरोबर फोटो आहेत असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या आ. निलेश राणे यांना तशा प्रकारचा एकही फोटो दाखवता आला नाही.परंतु सिध्देश शिरसाट सोबत निलेश राणे असलेले फोटो त्यांच्या स्वतःच्या एक्स/ट्विटर अकाउंटवर आहेत. सिध्देश शिरसाट हा निलेश राणेंचा आशीर्वाद घेतानाचा देखील फोटो आहे असे त्यांचे अनेक फोटो आमच्याकडे आहेत. त्यामुळे बिडवलकर खुन प्रकरणातील खरा आका निलेश राणेच आहेत असा घणाघाती आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत उपस्थित होते. वैभव नाईक यांनी केवळ आरोप न करता सिध्देश शिरसाट सोबत निलेश राणेंचे असलेले फोटो व सिध्देश शिरसाट याच्याविषयी निलेश राणेंनी आपल्या एक्स/ट्विटर अकाउंटवर केलेल्या पोस्टचा फोटो वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दाखविला.
वैभव नाईक पुढे म्हणाले, बिडवलकर खून प्रकरणात सिद्धेश शिरसाटला पकडल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निलेश राणेंनी पोलीस अधिक्षकांना दोन वर्षापूर्वीची प्रकरणे आता कशी काढता? अशी विचारणा केली. जिल्ह्यातील ड्रग्स व अवैध धंदे पहिल्यांदा बंद करा असे सांगत आक्रमक भूमिका घेतली होती. लोकप्रतिनिधी म्हणून निलेश राणे यांनी ज्या बिडवलकर कुटुंबावर वाईट वेळ आली आहे, त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. मात्र त्यांनी दोन वर्षांनी तक्रार दाखल केली म्हणून निलेश राणे त्यांच्या विरोधी भाष्य करत आहेत.
जनतेला माझी राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी माहीत आहे. पहिल्यांदा निलेश राणे यांनी आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशी आहे ती तपासावी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी विधानसभा सभागृहात जाहीरपणे राणेंनी केलेले गुन्हे वाचून दाखवले होते ते रेकॉर्डवर आहेत. यापूर्वी याच निलेश राणेंनी श्री. सावंत यांना हातपाय तोडत कशी मारहाण केली? अपहरण केले. त्यामुळे कोणते गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले. अनेकदा लोकांना त्यांनी कशा धमक्या दिल्या याची माहिती जनतेला आहे. यापूर्वी बाळा वळंजू आणि सुदन बांदिवडेकर यांच्यावर कसे हल्ले झाले, कोणी केले? हे जनतेला माहीत आहेत. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमचे कॉल डिटेल्स जनतेसमोर जाहीर करा असे आव्हान वैभव नाईक दिले. अंकुश राणे खून प्रकरणात, छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेत आणि आता बिडवलकर प्रकरणात मी आवाज उठविला म्हणून उलट माझ्यावर निलेश राणे आरोप करत आहेत. मात्र आता तुमची सत्ता आहे, माझे सीडीआर काढा मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचा इशारा माजी आ. वैभव नाईक यांनी दिला.जर आम्ही अशी प्रकरणे बाहेर काढली नाहीतर अशीच प्रकरणे घडत जाणार आहेत.
वैभव नाईक म्हणाले, काल आ.निलेश राणे यांच्या बाजुला पत्रकार परिषदेत बसलेले लोकच वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वाल्यांकडून ३ हजार रु. हप्ता गोळा करत आहेत. हद्दपारीचे प्रस्ताव असलेले काही लोकांना घेवून निलेश राणे फिरत आहेत. त्यामुळेच कालच्या पत्रकार परिषदेत भाजपचे लोक आले नाहीत. पोलीसांनी केलेली हद्दपारी निलेश राणेंमुळेच थांबविण्यात आली आहे मात्र ती पोलिसांनी तातडीने करावी. पोलिसांनी मला कधीही बोलावले तरी मी चौकशीला जाण्यासाठी तयार आहे.मात्र मला अडकवण्यासाठी सगळी टीम कामाला लागली आहे.या प्रकरणात आकाच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणात हा खुन उघडकीस आला आहे. सिद्धेश शिरसाटला वाचवण्यासाठी आकाचा प्रयत्न असल्यामुळे आम्ही त्यात भाग घेतला आहे. दोन वर्षांपूर्वीचे प्रकरण पोलीस का उघडतात? अशी विचारणा त्यांनी केली होती. त्यामुळेच याप्रकरणाला आम्ही वाचा फोडली म्हणून माझ्यावर निलेश राणे टिका करत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
जिल्ह्यातील अनेक प्रकरणांमध्ये आम्ही जनतेच्या पाठीशी राहिलो.माझ्या १० वर्षात मी अवैध धंदेवाले किंवा अन्य कोणाकडून आमच्या कार्यक्रमांसाठी पैसे घेतल्याचा पुरावा दाखवा. आमच्याकडून गुन्हेगारी होऊ शकत नाही. राणेंकडून उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यात येऊ देणार नाही, माझ्या घराला कुलूप ठोकणार अशा धमक्या दिल्या जात आहेत. हि गुंडगिरी प्रवृत्ती कोणाची आहे हे जिल्ह्यातील व राज्यातील जनतेला माहित आहे. आता सत्तेत आल्याने सिंधुदुर्गात पुन्हा राणेंची दहशत दिसत असल्याचा आरोपहि वैभव नाईक यांनी केला.
सतीश सावंत म्हणाले, सावडाव येथे सामाजिक कार्यकर्ते नयना सावंत व वैभव सावंत यांना उपसरपंच दत्ता काटे व त्यांच्या सहका-यांनी अमानुषपणे मारहाण केली. याघटनेत पोलीसांनी आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी पोलीस ठाण्यात आरोपी आलेले होते. पोलिस यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे.डॉक्टर आणि पोलीस संगनमताने आरोपींना अभय देण्याचा प्रयत्न करीत आहेत.सावडाव धरण प्रकल्पाच्या कामाविरोधात न्यायालयात गेल्याने आरोपींनी हि मारहाण केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.