रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजप लढविणार – केंद्रीयमंत्री नारायण राणे

पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे व हा मतदार संघ भाजपच लढविणार आहे. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गुरुवारी सिंधनगरी येथे दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघावर शिंदे गटाचे शिवसेना दावा करत असून किरण सामंत लोकसभेचे उमेदवारी मागत आहेत याबाबत पत्रकाराने लक्ष वेधले असता नारायण राणे म्हणाले या मतदारसंघात भाजपच आपला उमेदवार देणार आहे. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे तो निवडून आणू व भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.आपण लोकसभेला उभे राहणार का या प्रश्नावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले. हा माझा प्रश्न नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष ठरवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!