माजी आमदार उपरकर यांची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेमध्ये कोकणी खाद्य व फळे विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कोकण महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेच्या याबाबतच्या निवेदनात उपरकर यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून जिल्हयात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. ते विशेषतः कोकण रेल्वेतून प्रवास करताना मासे व कोकणी फळे व खाद्य पदार्थ खाण्याला त्यांची पसंती असते. कोकण मार्गावरून गोव्यापर्यंत हे पर्यटक जात असतात. या गाडीतून जाताना कोकणी खाद्य पदार्थ विशेषतः मासे जेवण, माशांचे सार, माशांची तळलेली तुकडी तसेच भात, सोलकढी असे पदार्थ मिळण्याची गरज आहे. तसेच फळांच्या सिझनमध्ये आंबा, काजू, जांभूळ, करवंदे, फणसाचे गरे अशी विविध फळे आकर्षक टोकरीतून (डब्यातून) देणे गरजेचे आहे. यासाठी अधिक आकार घेतला, तरी चालेल. कोकणातून जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये कोकणातील वेगवेगळे खाद्य पदार्थ देण्याची सूचना नेमल्या कॅटरर्स व ठेकेदार यांना सूचित करावे. ज्याप्रमाणे साऊथमध्ये गेल्यानंतर कढ राईस, इडली वडा, वडा, डोसा केळ्याची भजी, सांबारभात अशा प्रकारचे खाद्य पदार्थ दिले जातात. उत्तर दिशेने जाताना डाळ भात, डाळ चपाती, पनीर भाजी अशा विविध प्रकारच्या भाज्या दिल्या जातात. त्या व्यतिरिक्त कोणतेही पदार्थ दिले जात नाहीत. याकरिता कोकणातून धावणाऱ्या सर्व गाड्यांमधून जाणाऱ्या प्रवाशांना आलू सब्जी व कोकणी फळे व मासे जेवण सिझनमध्ये मिळण्याची गरज आहे. कोकणातून जाताना या गाड्यांमधून नाश्ता आणि माशांचे जेवण, फळांची प्लेट, कोकणी पद्धतीने प्रवाशांना देण्याची सूचना करून येणाऱ्या पर्यटकांना कोकण खाद्यांची आवड निर्माण व्हावी व कोकण रेल्वेतून कोकणी पदार्थ मिळतात, अशी कोकण रेल्वेची ख्याती व्हावी, अशी विनंती आहे. जर ठेकेदाराला या गोष्टी पुरविता येत नसतील, तर सुशिक्षित बेरोजगारांना हे पदार्थ सर्व गाड्यांमध्ये विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही उपरकर यांनी केली आहे.











